मुंबई तसंच उपनगरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही बसला आहे. उद्धव ठाकरे राहत असलेल्या कलनागर परिसरात पाणी साचलं आहे. महापालिकेचा कारभार शिवसेनेकडे असून शिवसेना प्रमुखांनाच पावसाचा फटका बसला असून मातोश्रीचा परिसर जलमय झाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. वांद्रे येथील कलानगर, सरकारी वसाहत, शास्त्री वसाहत आणि एमआयजी ग्राऊंड परिसरात पाणी साचलं आहे.

विशेष म्हणजे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सोमवारी बोलताना मुंबई कुठेही तुंबली नसल्याचा दावा केला होता. पण सलग दोन दिवस सुरु असलेल्या पावासामुळे सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपुर्वी मातोश्रीजवळील नाल्याची सफाई न झाल्यामुळे मुख्य अभियंत्यांसोबत बाचाबाची झाली होती. यानंतर उद्धव ठाकरेंनीच महापौरांना नाल्याची साफसफाई न झाल्याचं लक्षात आणून दिलं होतं.

मुंबईकरांना वाचवण्यासाठी नौदलाचे जवान उतरले रस्त्यावर

मुंबईतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे. तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा ठप्प झाली असून, रस्ते वाहतुकही विस्कळीत झाली आहे. राज्य सरकारनेही सतत सुरु असणाऱ्या मुसळधार पावासमुळे सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले आहे. दरम्यान कुर्ला परिसरात अडकलेल्या मुंबईकरांच्या मदतीसाठी भारतीय नौदल रस्त्यावर उतरलं आहे.