मागील काही दिवसांपासून मुंबईत करोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने आपल्या हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी या संदर्भातील आदेश दिले असून आता मुंबईतील शाळा थेट नवीन वर्षीच उघडल्या जाणार आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी २३ नोव्हेंबरपासून शाळा आणि महाविद्यालये सुरू होणार असताना मुंबईत मात्र असा निर्णय घेण्यात आला आहे. याच निर्णयावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.

मुंबई महापालिका हद्दीतील शाळा डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याच्या निर्णयाबाबत एबीपी माझाशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, “आपापल्या हद्दीतील शाळा सुरु करण्याचा निर्णय हा मी स्थानिक प्रशासनावरच सोडला होता. मुंबई महापालिका आयुक्तांसोबत सकाळी माझी या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत मुंबई हद्दीतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. माझ्या अजूनही इतर संबंधितांशी बैठका आणि चर्चा सुरुच आहेत. ज्या ठिकाणी पूर्ण तयारी झाली आहे, त्या ठिकाणी शाळा २३ नोव्हेंबरला सुरु कराव्यात. ज्या ठिकाणी अद्याप तयारी झालेली नाही त्याठिकाणी स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा!”

राज्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. तर दुसरीकडे मुंबईसह राज्यातील करोनाचं सावट अजूनही कमी झालेलं नाही. जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी रस्त्यांवर गर्दीही वाढताना दिसत आहे. त्यामुळे करोना प्रसाराचा धोका वाढला असून दिवसागणिक रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.