करोना साथरोगाचा प्रतिकार करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यात विविध पोलीस ठाण्यांत सुमारे दीड लाख गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २९ हजार व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, तर ८८ हजार वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात टाळेबंदी लागू केल्यापासून म्हणजे २२ मार्च ते ५ जुलै या कालावधीत १ लाख ५१ हजार ३३३ गुन्हे नोंद झाले आहेत. २९ हजार ६३५ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, असे सांगण्यात आले. करोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी अहोरात्र मेहनत करत आहेत. परंतु काही विघातक प्रवृत्तीच्या लोकांकडून त्यांच्यावर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा प्रकारच्या २९४ प्रकरणांत ८६१ जणांना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. १०० क्रमांकावर १ लाख तक्रारी पोलीस विभागाचा १०० हा दूरध्वनी क्रमांक सर्व जिल्ह्य़ांत २४ तास कार्यरत असतो. टाळेबंदीच्या काळात या क्रमांकावर १ लाख ५ हजार ९१२ जणांनी तक्रारी नोंदवल्या. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १ हजार ३३५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ८८ हजार ३३० वाहने जप्त करण्यात आले अशी माहिती देण्यात आली.