प्रत्युषाचा आईशी झालेला शेवटचा संवाद

मी राहुलशी मैत्री करून आयुष्यात खूप पस्तावलेय, यातून बाहेर पडण्याचा मार्ग मी शोधतेय.. प्रत्युषाचा ३१ मार्च २०१६ रोजी आईशी झालेला तो अखेरचा संवाद. त्यानंतर अंबरनाथला राहणाऱ्या काकूला फोन करून तिने मला आता जगण्याची इच्छा नाही, असेही सांगितले. खंबीर असलेल्या माझ्या मुलीच्या आत्महत्येला राहुलच जबाबदार असल्याचे सांगत प्रत्युषाची आई सोमा बॅनर्जी यांनी राहुलविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी राहुलविरोधात प्रत्युषाला आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याने मंगळवारी उशिरापर्यंत त्याला अटक झाली नाही.

शुक्रवार, १ एप्रिलला गोरेगाव, मोतीलालनगर येथील घरात प्रत्युषाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बांगूरनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष भंडारे आणि पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्य़ाचा तपास सुरू आहे.