मध्य रेल्वे मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दिल्ली अशी धावणारी राजधानी एक्स्प्रेस आठवडय़ातून चार वेळा चालवण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर तब्बल २७ वर्षांनी मुंबईपासून दिल्लीपर्यंत धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसला हिरवा दिवा दाखवण्यात आला. जानेवारीपासून ही गाडी सुरू झाली. मुंबईबरोबरच नाशिक, जळगाव, भोपाळ येथील प्रवाशांची त्यामुळे सोय झाली. सध्या आठवडय़ातून दोन वेळा धावणाऱ्या या गाडीच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. मात्र मध्य रेल्वेकडे एक गाडी असल्यामुळे  एक्स्प्रेसच्या फेऱ्या वाढवता येत नव्हत्या. मात्र आता एक गाडी मध्य रेल्वेकडे पाठवण्यात येणार असून पुढील १५ दिवसांत राजधानी एक्स्प्रेसच्या आठवडय़ातून चार फेऱ्या सुरू होणार आहेत.

दुसऱ्या राजधानीलाही आगामी एक-दोन दिवसांत अजून एक रेक मिळणार असून ‘राजधानी’च्या फेऱ्या वाढवणे शक्य होईल.  दुसरी गाडी येताच तिलाही पुश-पुल इंजिन लावण्यात येणार असून हे काम पूर्ण होण्यास एक आठवडा लागेल, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.