ठाणे येथील मुंब्रा आणि श्रीनगर भागात मंगळवारी भरदिवसा चोरटय़ांनी घरात घुसून सुमारे दीड लाखांचे दागिने लुटून नेल्याचा प्रकार घडला असून श्रीनगर येथील घटनेत पाणी पिण्याच्या बाहाण्याने घरात शिरुन चोरटय़ांनी चाकूचा धाक दाखवून दागिने लुटले. या दोन्ही घटनांमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
दिवा पुर्व भागातील दिगंबर या इमारतीत सुमन रघुनाथ (६६) राहतात. मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अनोळखी महिला आणि पुरुष त्यांच्या घरात शिरले. त्यानंतर त्यांनी एक लाख पाच हजारांचे दागिने लुटून नेले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किसननगर येथील ओमशक्ती या इमारतीत रुपाली महेश पाटील (२३) राहतात. मंगळवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आला. शेठ आहेत का, अशी विचारणा करीत पाणी पिण्याचा बाहाणा करून तो घरात शिरला. त्यानंतर त्याने घराचा दरवाजा आणि खिडकी बंद करून मुलाच्या गळ्याला चाकू लावत सुमारे ४८ हजारांचे सोन्याचे दागिने लुटून नेले. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.