मुंबई : ई-पासचे निर्बंध हटविल्यानंतर रो रो सेवेला शनिवार-रविवारी ५० टक्के तर आठवडय़ाच्या इतर दिवसांमध्ये सरासरी ४० टक्के प्रतिसाद मिळत आहे. पुढील आठवडय़ापासून दररोज दोन फेऱ्या नियमित सुरू राहणार असल्याचे ‘एमटूएम फेरीज’च्या प्रवक्त्याने सांगितले.

मार्चच्या दुसऱ्या आठवडय़ात मुंबई ते मांडवा या रो रो सेवेची सुरुवात झाली. मात्र लगेचच टाळेबंदीमुळे ही सेवा ठप्प झाली. त्यानंतर गणेशोत्सवादरम्यान रो रो सुरू करण्यात आली. सध्या आठवडय़ाच्या दिवसात रोज दोन फेऱ्या नियमितपणे सुरू असून, शनिवार-रविवारी त्यामध्ये दुपारच्या वेळी आणखी एका फेरीची वाढ करण्यात येत आहे. एमटूएम फेरीजने पुढील आठवडय़ासाठीचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे.

रो रो सेवेमध्ये एकावेळी ५०० प्रवासी, १४० वाहनांना परवानगी आहे. सध्या आठवडय़ाच्या दिवसात ३० ते ४० टक्के  प्रवासी, तर सुमारे ३० वाहने प्रवास करतात असे एमटूएम फेरीजच्या प्रवक्त्याने सांगितले. तर आठवडय़ाच्या अखेरीस सरासरी ५० टक्के  प्रवासी आणि सुमारे ६० वाहने रो रोने प्रवास करतात. ई-पासचे निर्बंध हटविल्यानंतर अनेकांनी स्वत:च्या वाहनाने शहराबाहेर प्रवास सुरू केले आहेत. मात्र रो-रोच्या प्रवाशांत मोठी वाढ झालेली नाही.