आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत महायुतीच्या किमान २२० जागा जिंकणारच असा निर्धार भाजपाचे निवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. जिथे भाजपा उमेदवार असतील तिथे आणि जिथे मित्र पक्षांचे उमेदवार असतील तिथेही भाजपा निवडणूक लढणार आहे, हे जाणून सर्व २८८ जागांवर कामाला लागण्याच्या सुचना पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

मुंबईमधील गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन केंद्रात आयोजित विशेष कार्यसमितीच्या बैठकीला संबोधित करताना चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, पक्षाच्या प्रदेश प्रभारी सरोज पांडे, राष्ट्रीय सचिव व्ही. सतिश, प्रदेश संघटन महासचिव विजय पुराणिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, रावसाहेब दानवे, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेक खासदार, आमदार आणि पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अफाट लोकप्रियता, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बळकट केलेली पक्ष संघटना, राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची यशस्वी कामगिरी हे सर्व आपल्याकडे आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने आपल्याला भरभरून आशीर्वाद दिले आहेतच, आता पुन्हा एकदा आपल्याला जनतेकडे त्यांचे असेच भरभरुन आशीर्वाद मिळवण्यासाठी जायचं आहे. आगामी निवडणुकीत राज्यातील जनता आपल्या पाठिमागे नक्कीच ठामपणे उभी राहिलच. शिवसेना-भाजपा युतीबद्दल बोलताना पाटील म्हणाले, युतीचा निर्णय भाजपाध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य वेळी जाहीर करतील. मात्र, तोवर आपण सर्वांनी सर्व शक्तीनिशी कामाला लागलं पाहिजे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना पाटील म्हणाले, ७० वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करुन दाखवलं आहे. तसेच ईव्हीएमवर शंका उपस्थित करणाऱ्यांनी बारामतीत सुप्रिया सुळे कशा विजयी झाल्या? असा सवालही पाटील यांनी विरोधकांना विचारला. संघटनात्मक बांधणी बद्दल बोलताना पाटील म्हणाले, संघटनात्मक बांधणीमुळे आपले जनतेशी थेट आणि घट्ट नातं तयार झालं आहे. बूथ रचना आणि पन्ना प्रमुख या भाजपाच्या संघटनात्मक रचनेमुळे लोकसभा निवडणुकीत चमत्कार करून दाखवला. विधानसभा निवडणुकीत सुद्धा संघटनात्मक रचनेचा उपयोग करुन प्रामाणिकपणे काम करायचं आहे.

संपूर्ण देशात भाजपाचा पक्का जनाधार निर्माण झाला आहे. पण आपल्याला त्यावर समाधान न मानता बरेच अंतर पुढे जायचे आहे. भाजपापासून दूर राहिलेल्या समाज घटकांनाही आपल्याला जोडून घ्यायचे आहे. गरीब, श्रीमंत, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सुशिक्षित, अशिक्षित असे सर्वजण आपलेच आहेत. आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. यासाठी सदस्यता अभियान अत्यंत महत्त्वाचे असून, ते यशस्वी करायचे आहे. असा एकही बूथ राहता कामा नये, जिथे भाजपचे किमान २५ सक्रिय कार्यकर्ते नसतील. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाला सर्वव्यापी सर्वस्पर्शी बनवण्याचा निर्धार करु, अशी अपेक्षाही यावेळी पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.