एकीकडे संपूर्ण राज्य करोना विषाणूशी लढत असताना शुक्रवारी रात्री राज्य सरकारने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यामध्ये मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या जागेवर नगरविकास खात्याचे प्रधान सचिव इक्बाल चहल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. चहल यांच्या नियुक्तीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असला तरीही प्रशासकीय पातळीवर चहल यांचा अनुभव दांडगा आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य अधिकारी म्हणून चहल यांनी याआधी काम पाहिलेलं आहे.

इक्बाल चहल हे १९८९ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. धारावीतील कामाचा अनुभव आता चहल यांना तिकडील करोनाची परिस्थिती रोखण्यासाठी कामी येतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याआधी चहल यांनी म्हाडाचे अध्यक्ष, उत्पादन शुल्क आयुक्त, औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलेलं आहे. प्रशासकीय कामकाजासोबत चहल आपल्या शाररिक तंदुरुस्तीसाठी ओळखले जातात. २००४ पासून ते नियमी मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असतात.

इक्बाल चहल यांचा अल्पपरिचय –

  • इक्बाल चहल हे १९८९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
  • सध्या त्यांच्याकडे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव म्हणून काम पाहत आहेत.
  • याआधी चहल यांनी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव म्हणून काम पाहिलेलं आहे.
  • याचसोबत धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य अधिकारी म्हणूनही चहल यांनी काम केलं आहे.
  • याव्यतिरीक्त वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाचे सचिव ही जबाबदारीही चहल यांनी पार पाडली आहे.
  • यासोबत केंद्रीय गृहमंत्रालयात चहल यांनी सहसचिव आणि ओसीडी ही भूमिकाही निभावली आहे.
  •  इक्बाल यांचं शिक्षण राजस्थानमधील जोधपूर येथे झालेलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याची ओरड जनमानसात होत होती. याच कारणामुळे प्रवीण परदेशी यांची बदली करण्यात आल्याचं बोललं जातंय. त्यामुळे इक्बाल चहल आपली जबाबदारी कशी निभावतात याकडे सर्व मुंबईकरांचं लक्ष असणार आहे.