शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी आर्थिक गैरव्यवहारावरुन आरोप केला असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील चौकशीचे संकेत दिले आहेत. किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. पण त्यांनी या आरोपाचा फक्त राजकीय वापर न करता संबंधीत यंत्रणांकडे कागदपत्र सादर केल्यास या आरोपांची चौकशी केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर भाष्य केले. सोमय्या यांनी काही कागदपत्र सादर केली असून यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा त्यांचा आरोप आहे. या कंपन्यांचा उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांचा संबंध आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केल्याचे फडणीस यांनी म्हटले आहे. मी किरीट सोमय्या यांना सल्ला दिला आहे. त्यांनी राजकीय फायद्यासाठी याचा वापर न करता सक्तवसुली संचालनालयासारख्या (ईडी) यंत्रणेकडे तक्रार करावी असे ते म्हणालेत. उद्धव ठाकरेंची चौकशी होणार का या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, सोमय्यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. जर गैरव्यवहार झाले असेल तर त्याची चौकशी होणारच. काय आहे सोमय्यांचे आरोप ? सोमय्या यांनी सात बोगस (शेल) कंपन्यांची नावे जाहीर केले आहेत. या कंपन्यांमार्फत ठाकरे यांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत का, असा सवाल सोमय्या यांनी केला आहे. जगमंद्री फिनवेस्ट लि., किम इलेक्ट्रॉनिक्स लि, जेपीके (इंडिया) ट्रेडिंग प्रा.लि. या बोगस कंपन्यांमध्ये ठाकरे यांची गुंतवणूक आहे का, असा सवाल सोमय्या यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी रिगलगोल्ड ट्रेडिंग आणि व्हॅनगार्ड ज्वेल्स लि. या कंपन्यांद्वारे रक्कम फिरविली. त्यांच्याशी ठाकरे यांचेही लागेबांधे आहेत का, याचाही खुलासा ठाकरे यांनी करावा, असे सोमय्या यांनी म्हटले आहे. लेक्सस इन्फोटेक लि. आणि यश व्ही ज्वेल्स लि. या कंपन्यांमध्येही ठाकरे यांची गुंतवणूक आहे का, अशी विचारणा सोमय्या यांनी केली असून या कंपन्यांवर सेबीने बंदी घातली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.