मुंबई : राज्यातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. मात्र यावेळी अल्पसंख्यांक कोट्यातील रिक्त जागांसदर्भातील निकषामध्ये बदल करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार अल्पसंख्यांक महाविद्यालयांना अल्पसंख्यांक कोट्यातील रिक्त जागा पहिल्या फेरीनंतर सर्वसाधारण जागांमध्ये प्रत्यार्पित करण्याची संधी महाविद्यालयांना मिळणार आहे. त्यामुळे ज्या अल्पसंख्याक महाविद्यालयातील अल्पसंख्याक कोट्यातील जागा रिक्त राहण्याचे प्रमाण कमी होणार आहे.
उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अल्पसंख्यांक कोट्यांतर्गत विद्यार्थ्यांना ५० टक्के जागा राखीव असतात. या कोट्यातील जागा शाळा व्यवस्थापनास तीन फेऱ्यापर्यंत गुणवत्तेनुसार भरण्याची मुभा असते. नियमित तीन फेऱ्या संपेपर्यंत महाविद्यालयांना अल्पसंख्यांक कोट्यातील जागा सर्वसाधारण जागांमध्ये प्रत्यार्पित करता येत नाही. तीन फेऱ्यानंतर या कोट्यातील रिक्त राहणाऱ्या जागा चौथी नियमित फेरी सुरू होण्यापूर्वी सर्वसाधारण जागांमध्ये प्रत्यार्पित करता येतात. मात्र आता उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ अल्पसंख्याक महाविद्यालयांना अल्पसंख्यांक कोट्यातील ५० टक्के जागांपैकी रिक्त राहणाऱ्या जागा पहिल्या फेरीनंतरच सर्वसाधारण जागांमध्ये प्रत्यार्पित करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. परंतु, दुसऱ्या फेरीवेळी अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेशाकरीता अर्ज प्राप्त झाल्यास त्या विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश अल्पसंख्याक कोट्यातून देण्यात येतील. त्यानंतर रिक्त असलेल्या अल्पसंख्याक कोट्यातील जागा सर्वसाधारण जागांमध्ये प्रत्यार्पित करण्याची मुभा महाविद्यालयांना असणार आहे.
अल्पसंख्यांक कोट्यातील रिक्त जागा सर्वसाधारण जागांमध्ये प्रत्यार्पित करण्याबाबतचा निर्णय हा महाविद्यालयांसाठी ऐच्छिक असणार आहे. कोणत्याही अल्पसंख्याक महाविद्यालयासाठी हा निर्णय बंधनकारक असणार नाही. त्यानुसार अल्पसंख्यांक महाविद्यालये प्रथम फेरीनंतर कोणत्याही फेरीवेळी जागा प्रत्यार्पित करण्याचा निर्णय घेऊ शकतात. तसेच नियमित तीन फेऱ्यांदरम्यान सर्वच जागा प्रत्यार्पित करण्याचेही अल्पसंख्यांक महाविद्यालयांना बंधनकारक असणार नाही. पहिल्या फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांपैकी काही जागा प्रत्यार्पित करण्याचीही मुभा अल्पसंख्यांक महाविद्यालयांना असणार आहे. यामुळे अल्पसंख्यांक कनिष्ठ महाविद्यालयांमधील जागा रिक्त राहण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
इन-हाऊस कोट्याच्या प्रवेशाबाबतही निकषात बदल
उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय हे एकाच परिसरात असल्यास अकरावी प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना इन हाऊस कोटा लागू होणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र त्याला विरोध झाल्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाण्यातील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थांच्या शाळांसाठी एक युनिट तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांकरीता त्याच संस्थेची शाळा व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय यासाठी महसूली जिल्ह्यामध्ये एक युनिट इन-हाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.