मुंबई: तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला आज सकाळी ११ वाजल्यापासून सुरूवात होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करण्याबरोबरच महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येणार आहे.

शिक्षण संचालनालयाकडून यंदा प्रथमच संपूर्ण राज्यामध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविऱ्यात येत आहे. त्यानुसार दहावीच्या निकालानंतर २१ मे पासून अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली. त्यापूर्वी दोन दिवस विद्यार्थ्यांना सरावाची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.

मात्र प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी सकाळी आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे प्रवेश प्रक्रियेचा खेळखंडोबा झाला. तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन अकरावी प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक २२ मे रोजी जाहीर करण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांना नोंदणी व प्राधान्यक्रम निश्चितीसह प्रत्यक्ष अर्ज ३ जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम भरता येईल. तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी ५ जूनला जाहीर होणार आहे. यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर ८ जून रोजी जाहीर होणार आहे. पहिली प्रवेश यादी १० जूनला जाहीर होईल व प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन ११ ते १८ जून दरम्यान प्रवेश घेता येईल.

अकरावीचा ऑनलाइन प्रवेश अर्ज दोन भागात विभागलेला आहे. पहिल्या भागात विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती भरायची आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेच्या मदतीने तसेच पालकांच्या मदतीने आपल्या अकरावी प्रवेशाचा वैयक्तिक माहितीचा पहिला भाग संकेतस्थळावर ऑनलाइन भरून घ्यावा. दुसरा भाग (पसंतीक्रम) हा विद्यार्थ्यांना महाविद्यालय निवडण्यासाठी पर्याय अर्ज भरावा लागणार आहे. गतवर्षीचे महाविद्यालयांचे प्रवेश पात्रता गुण (कटऑफ) आणि दहावीच्या परीक्षेत मिळाले गुण यांची सांगड घालून विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना महाविद्यालयांचा पसंतीक्रम निवडण्यावर भर देणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरताना काळजी घ्यावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य मंडळाच्या विद्यार्थ्याने आपले नाव व दहावीच्या परीक्षेचा क्रमांक टाकल्यानंतर त्याची बहुतांश माहिती ही संकेतस्थळावर उपलब्ध होईल. त्याचे विषयनिहाय गुण आपोआप अपडेट होतील. यावेळी विद्यार्थ्यांनी माहिती बरोबर असल्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. माहिती बरोबर असल्यास उर्वरित माहिती भरावी. प्रवेशाच्या प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात महाविद्यालयाचे संकेतांक क्रमांक विचारात घ्यावेत, महाविद्यालयातील शाखा, प्रकार, आरक्षणाचा गट, माध्यम, उपलब्ध असणारे वैकल्पिक विषय यांचा योग्य तो विचार करावा असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.