बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याने त्यांनी भाडेतत्त्वावर ४५० बसगाडय़ा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे बेस्टच्या ताफ्यामध्ये भाडेतत्त्वावरील बसगाडय़ा दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बेस्टचा तोटा कमी करण्यासाठी भाडेतत्त्वावर ४५० बसगाडय़ा घेण्याचा उपाय सुचवण्यात आला होता. मात्र त्याला कामगार संघटनांचा विरोध होता. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीतर्फे परळ येथे मंगळवारी बेस्ट कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी दहा मुद्दय़ांसह सामंजस्य कराराचा मसुदा कामगारांसमोर ठेवला. कामगारांनी या सामंजस्य करारास अनुकूलता दर्शवली. मंगळवारी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या बेस्ट प्रशासनासोबत वाटाघाटी झाल्या आणि त्याअनुषंगाने उभयतांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
बेस्ट उपक्रमाला झालेला तोटा मुंबई महानगरपालिका भरून देणार, बेस्ट कर्मचारी कपात करू नये, थकीत देणी द्यावी इत्यादी मुद्दे प्रशासनाने मान्य केले. त्यानंतर बेस्ट प्रशासन आणि संघटनात सामंजस्य करार झाला. हा करार मुंबई पालिकेनेही मान्य केला असून पालिका आयुक्तांनी लिखित पत्र बेस्टला दिले आहे.
कृती समितीने एप्रिल २००७ पासून भरती झालेल्या कामगारांना उर्वरित १० टप्प्यांतील वाढ मे २०१९ च्या पगारात द्यावी, सर्व कामगारांच्या मागणीपत्राबाबत करार करण्यासाठी त्वरित वाटाघाटी सुरू कराव्या, बेस्ट उपक्रमाला झालेला तोटा मुंबई पालिकेने भरून द्यावा, बेस्ट उपक्रमाच्या दैनंदिन खर्चासाठी मुंबई पालिकेने दरमहा पैसे द्यावे, स्वमालकीच्या ३ हजार ३३७ बसगाडय़ांचा ताफा आणि सर्व कर्मचारी बेस्ट उपक्रमाच्या नोकरीत कायम ठेवावे, भंगारातील बसच्या बदल्यात नवीन बस खरेदी करण्यासाठी मुंबई पालिकेने पैसे द्यावे, अतिरिक्त बसगाडय़ा भाडेतत्त्वावर घ्याव्या, निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी सप्टेंबर २०१९ पूर्वी द्यावी, जानेवारी २०१९ मधील आंदोलन काळातील अनुपस्थितीबाबत कोणत्याही कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करू नये, अशा मागण्या कर्मचारी संघटनेकडून करण्यात आल्या होत्या.
या संदर्भातील करार पालिकेस मान्य असल्याबाबत पालिका आयुक्तांनी दिलेल्या लेखी पत्रात या दहा मुद्दय़ांचा समावेश आहे.
या संदर्भात कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी मागण्या मान्य केल्याने कर्मचाऱ्यांनी विरोध मागे घेतल्याचे सांगितले.
कर्मचाऱ्यांची थकीत देणी, बेस्टमधील कर्मचारी कायम राहणे इत्यादी गोष्टी संमत झाल्या असून बेस्टसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावरील बसगाडय़ाही ताफ्यात येतील, असे राव म्हणाले.
तिकीट दर कमी करा
प्रवासी संख्या वाढवण्यासाठी तिकीट दर कमी करण्याची मागणी संघटनेतर्फे बेस्टला करण्यात आली आहे. दोन किलोमीटरमागे असलेल्या ८ रुपये तिकीट दराऐवजी पाच किलोमीटर मागे पाच रुपये तिकीट दराची आकारणी करण्याची मागणी केल्याचे राव म्हणाले. त्यामुळे प्रवासी व उत्पन्नात वाढ होईल.
बेस्ट आणि महापालिका व कामगार संघटना यांच्यात आज हा करार झाला. भाडय़ाने गाडय़ा घेण्याविरोधात मान्यताप्राप्त संघटनेने न्यायालयात दाखल केलेल्या याचिका मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे गाडय़ा भाडय़ाने घेता येणार आहेत. सध्या बेस्टकडे ३५०० गाडय़ांचा ताफा असून तो ६००० पर्यंत नेण्यात येईल. त्यामुळे बसगाडय़ांची वारंवारता वाढेल. प्रवाशांना बस वेळेवर मिळतील व त्यांचा वेळ वाचेल.
– प्रवीणसिंह परदेशी, पालिका आयुक्त