मुंबई: घरातून पळून आलेल्या आणि रेल्वे हद्दीत सापडलेल्या ५०४ अल्पवयीन मुलांची जानेवारी ते एप्रिल २०२२ या कालावधीत घरवापसी करण्यात मध्य रेल्वेला यश आले आहे. मध्य रेल्वेच्या मुंबईसह, पुणे, भुसावळ, नागपूर, सोलापूर या विभागात ही मुले सापडली आहेत. यापैकी सर्वाधिक मुले मुंबई विभागातील स्थानकांमध्ये सापडली असून त्यात २८५ मुला-मुलींचा समावेश आहे. कुटुंबीयांशी झालेला वाद, अभ्यासाचा ताण, शहराची ओढ, इत्यादी कारणांमुळे मुले-मुली घरातून पलायन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. पळून आल्यानंतर ते निरनिराळय़ा ठिकाणच्या रेल्वे स्थानकांमध्ये उतरतात. त्याची माहिती मिळताच अथवा संशयास्पद हालचालीवरून अशा मुला-मुलींना ताब्यात घेण्यात येते. रेल्वे पोलीस आणि चाईल्ड हेल्पलाईन सामाजिक संस्थेच्या मदतीने योग्य ती कार्यवाही करुन या मुला-मुलींना कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. राज्यात सापडलेल्या अल्पवयीन मुला-मुलींमध्ये सर्वाधिक २८५ मुले-मुली मुंबई विभागात सापडले असून यात २०६ मुले व ७९ मुलींचा समावेश आहे. त्यापाठोपाठ भुसावळ विभागात ९२ जण सापडले असून यात ४७ मुले व ४५ मुलींचा समावेश आहे. पुणे विभागात ५० मुले, २१ मुली, नागपूर विभागात १२ मुले व २० मुली, सोलापूर विभागात १५ मुले आणि ९ मुली सापडल्या आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२१ मध्ये मध्य रेल्वेच्या या पाचही विभागात ९७१ मुले आणि मुलींना ताब्यात घेऊन घरवापसी करण्यात आली होती.