मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीला आजपासून सुरूवात झाली आहे. निवडणूक होत असलेल्या २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता आजपासून नामनिर्देशपत्र सादर करण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ६६४ उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज दाखल केले.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांतील उमेदवारांना नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. एका नोंदणीद्वारे संबंधित प्रभागात एका उमेदवारास चार नामनिर्देशनपत्र दाखल करता येऊ शकतील. संकेतस्थळावर संपूर्ण नामनिर्देशनपत्र व शपथपत्र भरल्यानंतर त्याची मुद्रित प्रत काढून त्यावर स्वाक्षरी करावी लागेल. त्यानंतर ती प्रत विहित मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करणे आवश्यक राहील.

इच्छूक उमेदवारांनी आताच ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून घ्यावी व आपला लॉगीन आयडी व पासवर्ड आपल्याकडे जपून ठेवावा. कारण संपूर्ण नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्र भरण्यासाठी ते आवश्यक आहेत. आताच ऑनालाईन नोंदणी करून ठेवल्यास ऐनवेळी होणारी धावपळ टळू शकेल. नामनिर्देशनपत्रांतील आणि शपथपत्रांतील संपूर्ण माहिती भरल्यानंतर प्रिंटआऊटवर सही करून ती संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला विहित मुदतीत म्हणजे १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करणे सुलभ होईल. संकेतस्थळावरील ऑनलाईन माहिती मात्र १७ नोव्हेंबरला दुपारी २ वाजेपर्यंतच भरता येईल, याची नोंद घेण्याचे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.