मुंबई : म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाने छ. संभाजी नगर शहर व जिल्हा, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ९४१ सदनिका, तसेच ३६१ भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार बुधवारपासून (२८ फेब्रुवारी) नोंदणी, अर्ज विक्री-स्वीकृतीस सुरुवात झाली आहे.

२७ मार्चपर्यंत नोंदणी, अर्ज विक्री आणि संगणकीय पद्धतीने अनामत रक्कमेसह अर्ज स्वीकृती सुरू राहणार आहे. तर २८ मार्चपर्यंत आरटीजीएस-एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरत अर्ज सादर करता येणार आहेत. ४ एप्रिलला पात्र अर्जदारांची प्रारूप यादी तर १२ एप्रिलला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. सोडतीचे हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. पण सोडत नेमकी कधी काढली जाणार हे मात्र मंडळाने जाहीर केलेले नाही. सोडतीची जाहिरात लवकरच जाहीर करण्यात येईल असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : ५० टक्के पदवीधरांचे मतदार अर्ज अपात्र

हेही वाचा – मुंबईवरून विधानसभेत खडाजंगी; वर्षा गायकवाड यांच्या पंतप्रधानांवरील टीकेवरून भाजप अस्वस्थ

या सोडतीती पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २३३ सदनिकांचा, २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत २९८ सदनिका तसेच ५२ भूखंडांचा समावेश आहे. तसेच छ. संभाजी नगर मंडळाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत ४१० सदनिका आणि ३०९ भूखंडांचा समावेश आहे. अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च गट अशा सर्व गटातील घरांचा यात समावेश आहे.