मुंबई : मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीची फेब्रुवारी २०२५ मध्ये भाडेवाढ करण्यात आली. नवीन दरानुसार भाडे आकारणीसाठी मीटरमध्ये सुधारणा (रिकॅलिब्रेशन) करणे आवश्यक आहे. परंतु मुंबईतील सुमारे ७० टक्के रिक्षा, टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे. उर्वरित ३० टक्के रिक्षा, टॅक्सीचालकांना रिकॅलिब्रेशन करण्यासाठी ३१ मेपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर १ जूनपासून रिकॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा, टॅक्सीचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

इंधन खर्च, वाहनांची देखभाल-दुरूस्ती, वाहन कर्जावरील वाढलेले व्याजदर लक्षात घेऊन आणि खटुआ समितीच्या शिफारशींचा दाखला देत मुंबईतील टॅक्सी आणि ऑटोरिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून टॅक्सी आणि ऑटोरिक्षाच्या भाड्यात वाढ करण्यास मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाने (एमएमआरटीए) मान्यता दिली. यानुसार रिक्षाचे किमान भाडे २६ रुपये आणि टॅक्सीचे किमान भाडे ३१ रुपये झाले. मीटरचे रिकॅलिब्रेशन होईपर्यंत दरपत्रकानुसार भाडे आकारण्याची सूचना करण्यात आली होती. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सुमारे ४.६२ लाखांहून अधिक रिक्षा आणि टॅक्सी असून यापैकी सुमारे ७० टक्के रिक्षा, टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे.

● ३१ मेपर्यंत रिक्षा, टॅक्सीचे मीटर रिकॅलिब्रेशन करून घेणे अपेक्षित. रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास दरदिवशी ५० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येण्याची शक्यता.

● मुंबई महानगरातील १० आरटीओ कार्यालयांमध्ये ४.१७ लाख रिक्षा आणि ४४,८२५ टॅक्सी आहेत. आतापर्यंत नोंदणीकृत रिक्षा आणि टॅक्सीचे अनुक्रमे ६५.८० टक्के आणि ६८.३९ टक्के रिकॅलिब्रेशन झाले.

● मुंबई मध्य आरटीओमध्ये ७९ टक्के टॅक्सी रिकॅलिब्रेशन पूर्ण.

● मुंबई पश्चिम आरटीओमध्ये रिक्षांचे ६६.२७ टक्के आणि टॅक्सीचे ६८.२३ टक्के पूर्ण.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● मुंबई पूर्व आरटीओमध्ये रिक्षांचे ७१.९८ टक्के आणि टॅक्सीचे ६३.३१ टक्के रिकॅलिब्रेशन पूर्ण. ● बोरिवली आरटीओमध्ये रिक्षांचे ७८.९१ टक्के, टॅक्सीचे २०.७५ टक्के रिकॅलिब्रेशन पूर्ण.