मुंबई : हुंड्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या पुण्यातील वैष्णवी हगवणेचे प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्र सुन्न झाला आणि सर्वत्र संतापाची लाट उसळली. या प्रकरणासंदर्भात ‘लोकसत्ता’शी बोलताना ‘जारण’ चित्रपटाच्या चमूनेही संताप व्यक्त केला. आपल्या जवळच्या नात्यात एवढी हिंसा असणे, याहून कोणतेही मोठे भय आयुष्यात नाही. ज्या व्यक्तीवर प्रेम केले आहे, त्या व्यक्तीकडून छळ होणे, यासारखी भीतीदायक गोष्ट नाही, असे ‘जारण’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री व दिग्दर्शिका अमृता सुभाष यांनी सांगितले.
अनिस बाज्मी प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘जारण’ हा मराठी भयपट येत्या ५ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विवाहित राधा तिच्या जुन्या वाड्यात परतते. वाड्यात तिचं पाऊल पडताच सुरू होणाऱ्या अनाकलनीय व रहस्यमयी घटनांची गुंफण ‘जारण’ चित्रपटातून करण्यात आली आहे. काळी जादू, अंधश्रद्धा आणि एका विवाहितेचा भूतकाळ या चित्रपटातून उलगडण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘जारण’ चित्रपटाचे दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते, प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष, अभिनेते किशोर कदम आणि अभिनेत्री अनिता दाते यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला नुकत्याच दिलेल्या भेटीत मनमोकळा संवाद साधत भयपटाशी निगडित रहस्यमयी गोष्टी उलगडल्या. तसेच पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणावरही व्यक्त होत निषेध केला.
‘वैष्णवी हगवणेचे संपूर्ण प्रकरण विमनस्क करणारे आहे, मन सुन्न करणारा आणि आपल्याला अस्वस्थ करणारा हा एक भयंकर भयपटच आहे. वैष्णवी हगवणे कोणत्या त्रासातून गेली असेल, हे शब्दात मांडताच येणार नाही’, असेही अमृता सुभाष म्हणाल्या.