स्वपक्षीय सरकारच्या विरोधात मिलिंद देवरा मतप्रदर्शन करतात आणि राहुल गांधी त्यावर शिक्कामोर्तब करतात हे अधोरेखित होऊ लागले असतानाच ‘आदर्श’ चौकशी अहवालावर विधिमंडळात चर्चा झाली पाहिजे, या विरोधकांच्या मागणीत देवरा यांनीही सूर मिसळल्याने सुशीलकुमार शिंदे व अशोक चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या अडचणींत स्वपक्षीयांमुळेच वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
‘आदर्श’ चौकशी अहवाल फेटाळण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी सूचना राहुल गांधी यांनी केली असतानाच पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. आता या अहवालावर विधिमंडळात सविस्तर चर्चा होऊन सत्य बाहेर आले पाहिजे, असा सल्ला राहुल यांचे निकटवर्तीय मिलिंद देवरा यांनीही राज्य सरकारला दिला आहे. विशेष म्हणजे या अहवालावर चर्चेसाठी खास अधिवेशन बोलाविण्याची मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली असतानाच देवरा यांनीही त्यात सूर मिसळल्याने सरकारची कोंडी झाली आहे.
कलंकित लोकप्रतिनिधींना वाचविण्याचा वटहुकूम तसेच ‘आदर्श’ अहवालाबाबत मिलिंद देवरा यांनी विरोधात मतप्रदर्शन केले व राहुल गांधी यांनीही तशीच मागणी केल्याने काँग्रेसच्या वर्तुळात मिलिंद देवरा यांचे महत्त्व वाढले आहे. विधिमंडळात अहवालावर सविस्तर चर्चा व्हावी व सत्य बाहेर आले पाहिजे ही त्यांची मागणी म्हणजे राहुल गांधी यांची भूमिका आहे का, असा प्रश्न काँग्रेस नेत्यांना पडला आहे.
चर्चेत लक्ष्य होण्याची धास्ती
‘आदर्श’ अहवालात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मदतीच्या बदल्यात सवलती उकळल्याचा तसेच इमारत उभारण्याकरिता उपकृत केल्याचा गंभीर ठपका ठेवण्यात आहे.
*‘आदर्श’ला आर्थिक सवलती देऊ नयेत, या वित्त विभागाच्या शिफारसीकडे सुशीलकुमार शिंदे यांनी दुर्लक्ष केल्याचा ठपका आहे. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्यावरही ताशेरे ओढण्यात आले आहेत. विधिमंडळात अहवालात चर्चा झाल्यास शिंदे, चव्हाण, निलंगेकर लक्ष्य होण्याची शक्यता आहे.
* सुनील तटकरे व राजेश टोपे या राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांवर ताशेरे ओढण्यात आले असले तरी राष्ट्रवादीने या दोन मंत्र्यांना पाठीशी घालण्याचे आधीच सूचित केले आहे.
* पक्षाच्या नेतृत्वामुळेच एक केंद्रीय मंत्री वा दोन माजी मुख्यमंत्र्यांवर टीका होणे वा त्यांच्यावर आरोप होणे हे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसलाच अडचणीचे ठरू शकते. पक्ष नेतृत्व म्हणजेच राहुल गांधी किंवा नवे सत्ताकेंद्र झालेल्या मिलिंद देवरा यांना हे समजू नये, याबाबत काँग्रेसमध्येच आश्चर्याची भावना आहे.