मुंबई : कृषी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या आणि अतिवृष्टी बाधितांचा प्रश्न गंभीर असतानाही कृषी विभाग लॅपटॉप द्यायचा की, टॅब द्यायचा यावरून वाद घालत आहे. त्यासाठी बैठकीचे आयोजन केले जात आहे. शेतकरी मेला, शेतकऱ्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली तरीही सरकारला लाज वाटत नाही. शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नावर चर्चा करण्यासाठी कृषी विभागाला वेळ नाही, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
कर्जमाफीचे खोटे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांशी गद्दारी करणाऱ्या महायुती सरकारमुळे आठ महिन्यांत तब्बल १,१८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पश्चिम विदर्भात ७०७ तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ५२० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सत्तेसाठी या सरकारने भोळ्या – भाबड्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन मते मिळवली. पण शेतकऱ्यांना मिळाले काय तर कर्जमाफीसाठी समिती.
ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. हातातील पिके गेली आहेत. बँका कर्ज देत नाहीत. हतबल होऊन शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत. पण सरकारला काही देणेघेणे नाही. महायुतीतील तीन पक्ष एकमेकांशी भांडतात, समाजात फुट पाडतात आणि शेतकरी मात्र मरत राहतो. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे झाले आहे.
शेतकरी मेला, कुटुंब उद्ध्वस्त झाले तरीही यांना लाज नाही. कृषी खात्यातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा न करता कर्मचाऱ्यांना लॅपटॉप द्यायचे का टॅब या वरून वाद सुरू आहेत. हे खाते शेतकऱ्यांसाठी काम करते का ? शेतकरी आत्महत्यांसाठी असंवेदनशील आणि विश्वासघातकी महायुती सरकार जबाबदार आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे.