प्राध्यापकांचे राज्यपालांना पत्र

मुंबई विद्यापीठात उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे काम नियम डावलून होत असून याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ‘बॉम्बे युनिव्‍‌र्हसिटी अ‍ॅण्ड टिचर्स युनियन’ (बुक्टू) या प्राध्यापकांच्या संघटनेने राज्यपाल के. आर. नारायणन यांच्याकडे केली आहे.

गेल्या काही दिवसांत विविध विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आढळून आलेल्या चुकांकडे लक्ष वेधत बुक्टूचे अध्यक्ष सी. आर. सदाशिवन यांनी या पत्रात विद्यापीठात प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांकडून केले जात नसल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर नियम धाब्यावर बसवून अत्यंत अनुनभवी व कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांकडून उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करून घेतले जात आहे, असे सदाशिवन यांनी पत्रात म्हटले आहे. गेल्या वर्षीही प्राध्यापक संपावर असताना विद्यापीठाने अनुनभवी शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासून घेतल्या होत्या. तसेच, अनुभवी प्राध्यापकांच्या अभावी उत्तरपत्रिकांचे मॉडरेशनही झाले नव्हते, असा आरोप त्यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वर्षी तर भलत्याच विषयाच्या प्राध्यापकाकडून उत्तरपत्रिका तपासून घेतल्या जात आहेत. कळस म्हणजे विद्यापीठाने कॅपच्या प्रमुखांकडे परिपत्रक पाठवून शेजारच्या महाविद्यालयातून शिक्षकांना शोधून आणून उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण करून घ्या, अशा सूचना केल्या आहेत. हा प्रकार म्हणजे विद्यापीठ कायद्याचे सरळसरळ उल्लंघन आहे, असा आरोप त्यांनी केला.