अमली पदार्थ प्रकरणात आर्यन खान व अरबाज मर्चंटच्या अटकेच्या वेळी के. पी. गोसावी व भाजपाचे पदाधिकारी मनीष भानुशाली हे दोघे उपस्थित असल्याचा आरोप करत राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाच्या (एनसीबी) कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी शंका उपस्थित केल्यानंतर आता एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी यासंदर्भात उत्तर दिलं आहे. तसेच मनीश भानुशाली यांच्यासंदर्भातील त्या व्हिडीओवरही वानखेडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
नक्की वाचा >> प्रसारमाध्यमाकंडून प्रसिद्धी मिळावी म्हणून कारवाया करता का?; NCB चे समीर वानखेडे म्हणाले…
‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये वानखेडे यांना नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. नवाब मलिक यांनी असे आरोप केले आहेत की एनसीबीने ज्या लोकांच्या माहितीच्या आधारे कारवाई केली ते भाजपाशी संबंधित लोक आहेत. भाजपा आणि एनसीबीचे संबंध असल्याचे आरोपही करण्यात आलेत, असं वानखेडे यांना सांगत प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर उत्तर देताना, आम्ही यासंदर्भात अधिकृत पत्रक जारी केलं आहे. आम्ही या छाप्याच्या वेळी असणाऱ्या अधिकृत पंचांची यादीही जाहीर केलीय. त्यामुळे बोलण्यासारखं काही नाहीय, असं वानखेडे म्हणाले.
पुढे बोलताना, “तुम्हाला ठाऊक असेल तर अशी काही प्रकरणं झाल्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये त्याची चर्चा होते. अशावेळेस प्रसारमाध्यमांना आवरणं कठीण जातं. आमची कोणतीही कारवाई ही कायद्याचं उल्लंघन करणारी नाही असा माझा विश्वास आहे,” असं वानखेडे यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे भानुशाळी यांच्या व्हिडीओसंदर्भात बोलताना, “त्यावेळी तिथे गर्दी होती त्यामुळे ते लोक त्याला (आरोपीला) सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत होते,” असं उत्तर वानखेडे यांनी दिलं.
नक्की वाचा >> Aryan Khan Drugs Case: “वानखेडे साहेबांनी…”; भाजपा नेत्याने केला NCB कनेक्शनसंदर्भातील खुलासा
आर्यन खानकडे अंमलीपदार्थ सापडले नाही असं सांगितलं जातं आहे आणि एनसीबीच्या कामावर शंका उपस्थित केली जातेय, असा प्रश्न विचारण्यात आला असता वानखेडे यांनी एनसीबीची लक्ष्य काय आहे यासंदर्भात भाष्य केलं. सध्या आमचं ध्येय हे ही समस्या (अंमलीपदार्थाचा व्यापार आणि तस्करी) संपवण्याचं आहे. तसेच ही साखळी उद्धवस्त करणे आणि रिहॅबिटेशनचं काम आमच्याकडे आहे. महाराष्ट्र आणि गोव्याला ड्रग्स फ्री करायचं आमचा उद्देश आहे. त्यामुळे आम्हाला काही माहिती मिळाल्यास आम्ही त्यावर काम करतो. मग त्यामध्ये कोणती व्यक्ती सहभागी आहे याचा विचार (दबाव) आम्ही तपास करताना करत नाही, असं वानखेडे म्हणाले.