इंडियन मेडिकल असोसिएशनचा केंद्र सरकारच्या प्रणालीला विरोध, आंदोलनाचा इशारा
मुंबई : आरोग्य मंत्रालयाने देशामध्ये एकात्मिक औषध प्रणाली (मिश्र पॅथी) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्याचा सध्याच्या वैद्यकशास्त्रावर परिणाम होईल. इतकेच नव्हे तर आयुर्वेद नष्ट होईल, अशी भीती ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) दिला आहे. सर्व पॅथींच्या अवैज्ञानिक मिश्रणामुळे आरोग्य सेवेचा ऱ्हास होऊन देशातील आरोग्य सेवा एका शतकाने मागे जाईल. याचा परिणाम सर्वसामान्यांना भोगावा लागेल. त्यामुळे या जनविरोधी मिश्र पॅथीविरोधात आंदोलन करण्याचा इशारा ‘आयएमए’ने दिला आहे.
डॉक्टरांची कमतरता हे कारण पुढे करीत केंद्र सरकारने देशातील सर्व पॅथी एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहेत. मिश्र पॅथी राष्ट्रीय धोरण म्हणून स्वीकारण्यात आले आहे. देशातील सर्वोच्च नियोजन संस्था असलेल्या नीति आयोगाकडे मिश्र पॅथीमध्ये वैद्यकीय शिक्षण, क्लिनिकल प्रॅक्टिस, संशोधन तसेच सार्वजनिक आरोग्य आणि प्रशासनात विविध औषध प्रणालींचे मिश्रण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने ही गल्लत करण्यात येत आहे, असे ‘आयएमए’च्या वतीने सांगण्यात आले आहे. सध्या देशातील ६५० वैद्यकीय महाविद्यालयांतून दरवर्षी ९९ हजार ६३ एमबीबीएस डॉक्टर बाहेर पडत आहेत. त्यामुळे डॉक्टरांची कमतरता असल्याचा दावा चुकीचा असल्याचे संघटनेने म्हटले.
भारतातील डॉक्टर कुशल आहेत. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि आखाती देशांतील आरोग्य सुविधेचा भार भारतीय डॉक्टर समर्थपणे सांभाळत आहेत. सध्या एकात्मिक औषधाचा सराव फक्त चीनमध्येच केला जातो. मात्र या एकीकरणामुळे चिनी पारंपरिक औषधे नष्ट झाली आहेत. आयुर्वेदाची शुद्धता आणि वारसा जपल्याने आपले पारंपरिक औषध समृद्ध होईल. मात्र या प्रणालीचे मिश्रण आयुर्वेदाचे अस्तित्व नष्ट करेल. या अवैज्ञानिक मिश्रणामुळे मोठय़ा प्रमाणात आरोग्यव्यवस्था कमकुवत होण्याची शक्यता ‘आयएमए’कडून वर्तवण्यात आली.
‘आधुनिक वैद्यकशास्त्रामुळेच शक्य’
लसीकरणामुळे भारत स्मॉल पॉक्स आणि पोलिओपासून मुक्त झाला. एचआयव्ही, क्षयरोग आणि हिवतापाव्यतिरिक्त गोवर, गालगुंड आणि धनुर्वाताचे आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे जवळजवळ निर्मूलन करण्यात आले आहे. माता मृत्यूचे प्रमाण आणि बालमृत्यू दर घसरले आहे. करोनालाही लशीमुळे आटोक्यात आणणे शक्य झाले, हे आधुनिक वैद्यकशास्त्रामुळेच शक्य झाल्याचा दावा आयएमएने केला आहे.
मिश्र पॅथी धोरण लोकविरोधी असून, अद्याप नागरिकांना त्याचे दुष्परिणाम समजलेले नाहीत. मात्र नागरिकांना हे दुष्परिणाम समजावून सांगण्यासाठी ‘आयएमए’च्या वतीने प्रयत्न करण्यात येतील.
– जयेश लेले, महासचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन