मुंबई : बेस्ट प्रशासनाने परिवहन प्राधिकरणाच्या लेखी मंजुरीनंतर शुक्रवारपासून भाडेवाढ केली. दुप्पट भाडे आकारण्यात येत असल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. भाडेवाढ करूनही प्रवाशांच्या सुविधांमध्ये अद्याप विशेष सुधारणा झालेली नाही. बस वेळेवर न येणे, अपुरी वाहने, बसगाड्यांमधील एसीची अकार्यक्षमता, योग्य व सुरक्षित बसथांब्यांचा अभाव आदींमुळे प्रवाशांची गैरसोय सुरू आहे. भाडेवाढ केली, मात्र सेवेत सुधारणा कधी होणार, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.
इंधन दरवाढ, देखभाल खर्च आणि महसुलातील तुटीचा सामना करणारे बेस्ट प्रशासन गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी महानगरपालिका आणि परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर शुक्रवारपासून मुंबईत भाडेवाढ लागू केली. बेस्ट प्रशासनाकडे सद्यस्थितीत २ हजार ७८४ बसगाड्या असून त्यात ६६५ स्वामालकीच्या गाड्या आहेत. त्यातून दरदिवशी सुमारे ३१.५ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, अचानक केलेल्या भाडेवाढीनंतर प्रवाशांना आता प्रवासासाठी दुप्पट पैसे खर्च करावे लागत आहेत. मात्र, अद्याप सुविधांमध्ये सुधारणा झालेली नाही. प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत अपुऱ्या असलेल्या बसगाड्यांमुळे दररोज शेकडो प्रवाशांना थांब्यांवर रांगेत तासनतास ताटकळत राहावे लागते. बसही वेळापत्रकाप्रमाणे धावत नाहीत. तळपत्या उन्हात उभे राहून बसगाडीत गेल्यानंतर किमान थंड हवा मिळेल, या आशेवर प्रवासी असतात. मात्र, अनेकदा बसमधील वातानुकुलन यंत्रणेतील (एसी) तांत्रिक बिघाडाचा फटका प्रवाशांना बसतो आहे. गर्दीच्या वेळी अनेकदा एसीचा फ्लो कमी असल्यामुळे प्रवाशांना अस्वस्थ वाटते. श्वास घेणेही कठीण होते. अनेकदा वाहकांकडून प्रवाशांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. बसथांब्यावर प्रवासी उभे असतानाही बस थांबवली जात नाही.
मुंबई शहर व दोन्ही उपनगरात मिळून बेस्ट उपक्रमाचे सुमारे ६ हजार बसथांबे आहेत. त्यात ३ हजार बसरांग आश्रयस्थानके, तर ३ हजार बसथांबे खांबांचा समावेश आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून प्रवाशांना तळपत्या उन्हात बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रवाशांना यंदाही पावसाळ्यात बसथांब्याच्या खांबांजवळ गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे. भर रस्त्यात गाड्यांच्या वर्दळीत जीव मुठीत घेऊन प्रवाशांना बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. बसथांब्याच्या खांबांजवळ सुरक्षेच्या दृष्टीने उपयोजना करण्यात आलेल्या नाहीत.
भाडेवाढीनंतरही बेस्ट बस आणि सुविधांसंबंधित अनेक समस्या जैसे थे असताना भविष्यात यात काही सुधारणा होणार का, याबाबत विचारणा करण्यासाठी बेस्टच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.
तीन वर्षात ५०० बसरांग आश्रयस्थानके उभारण्याचा मानस
बेस्ट प्रशासनाने असलेल्या ३ हजार बसरांग आश्रयस्थानकांपैकी जवळपास २८०० स्टेनलेस स्टीलची आधुनिक पद्धतीचे बसरांग आश्रयस्थानके आहेत. तसेच, येत्या दोन ते तीन वर्षात महानगरपालिका प्रशासनाच्या परवानगीनंतर मुंबईत ४७५ ते ५०० अत्याधुनिक पद्धतीची बसरांग आश्रयस्थानके उभारण्याचा बेस्ट प्रशासनाचा मानस आहे.