भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात किरीट सोमय्या यांनी तक्रार केली आहे. माझ्यावर झालेल्या हल्ल्यात संजय पांडे यांच्या सांगण्यावरुन खार पोलीस स्टेशनचे अधिकारी सहभागी झाले होते असा किरीट सोमय्यांचा आरोप आहे. किरीट सोमय्यांनी राज्यपालांकडे याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. किरीट सोमय्या यांच्यासोबत भाजपाचं शिष्टमंडळ होतं. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी संजय पांडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे. "मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी कसा खोटा एफआयआर दाखल केला आणि खास पोलिसांना कारवाई करायला लावली याचे पुरावे राज्यपालांकडे दिले आहेत. संजय पांडे यांना मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निलंबित केलं पाहिजे. खार पोलिसांनी मान्य केलं आहे की, पोलीस आयुक्तांनी आमच्याकडे वांद्रे पोलीस स्टेशनचा एफआयआर पाठवला आहे ज्यामध्ये कोणाचीही सही नाही. हे एफआयआर अस्तित्वातच नाही," असा दावा किरीट सोमय्यांनी केला. उद्धव ठाकरेंचं उद्धट सरकार आणि पोलीस आयुक्त बनवानवी करत आहेत. शिवसेनेच्या ७०-८० गुंडांना वाचवण्यासाठी खोटा एफआयआर घेतला असा आरोप यावेळी किरीट सोमय्यांनी केला आहे. "आम्ही राज्यपालांकडे पोलीस आयुक्तांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे एफआय़र रद्द करण्यास सांगितलं आहे. ८४ तास उलटूनही एफआयआर का घेतला जात नाही?,"अशी विचारणा किरीट सोमय्यांनी केली आहे. "देवामुळे आणि कमांडोंमुळे मी आज इथे उभा आहे. संजय पांडे उद्धव ठाकरेंची किती चमचेगिरी करतात. कमांडोंनी मला वाचवलं. काठ्या, दगड, काचेच्या बाटल्या, चपला आल्या तरी त्यांनी मला वाचवलं. त्यांनी माझी गाडी बाहेर काढली. दगड लागल्याने काच फुटली आणि ती लागल्याने किंचित जखम झाली. पोलिसांनी त्याचा पंचनामा केला आहे. मी देवकृपने वाचवलो. ती काच डोळ्याला लागली असती तर…उद्धव ठाकरे आणि माफिया सेनेची मी जिवंत राहू नये अशी इच्छा होती का?," अशी विचारणा किरीट सोमय्यांनी केली आहे.