पवई तलाव ४० टक्के गाळाने व्यापले
पवई तलावातील गाळावरून बाहेर येणाऱ्या मगरींना अटकाव करण्यासाठी पालिकेने आता तलावाभोवतीच्या गाळातच चर खणण्याची युक्ती अवलंबली आहे. यामुळे तलावातील मगरींना हवा-पालटासाठी बाहेर रस्त्यावर येण्याचा खुश्कीचा मार्ग बंद झाल्याने पालिकेने सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, ही सुटका औटघटकेची ठरण्याची शक्यता आहे. कारण, भविष्यात या खणलेल्या चरांमध्ये मगर येऊन अडकली तर तिला तेथून बाहेर काढणे जिकिरीचे बनणार आहे, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.
पवई तलावाचे ४० टक्के क्षेत्र गाळाने व्यापले आहे. खुद्द पालिकाच याची कबुली देते आहे. मग पालिकेने हा संपूर्ण गाळचा का काढला नाही, असा सवाल पर्यावरणवादी करीत आहेत. कारण याच गाळावरून एक किशोरवयीन मगर मुख्य रस्त्यावर अवतरल्याने दोन दिवसांपूर्वी तलाव परिसरात गोंधळ उडाला होता. याबाबत ७ जुलैच्या ‘लोकसत्ता मुंबई’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पालिकेने त्यावर चर खणण्याचा तोडगा काढला. मात्र हा उपाय वरवरची मलमपट्टी ठरण्याची शक्यता आहे.
पवई तलावाशी संबंधित समस्या वाढत असून त्याकडे महानगरपालिका व वन विभागाचे दुर्लक्ष होते आहे. तलावातून काढलेला गाळ तलावाच्या संरक्षक भिंतीजवळच टाकल्याने भिंतीची उंची व गाळाची उंची समान झाली होती. हा मार्ग मगरींना तलावाबाहेर येण्याकरिता खुश्कीचा ठरतो आहे. यावर उपाय म्हणून संरक्षक भिंतीच्या उंची एवढा साठलेला गाळ काढण्याऐवजी प्रशासनाने या तलावाभोवती चर खणला आहे. जेणेकरून मगरींना मुख्य रस्त्याकडे येता येणार नाही. परंतु चर खणण्याऐवजी तलावात साठलेला गाळ पूर्णत: का काढण्यात आला नाही, असा सवाल ‘मिशन सेव्ह पवई लेक’चे प्रमुख सुनीश कुंजू यांनी केला आहे. तसेच, भविष्यात या खणलेल्या भागात येऊन मगर अडकल्यास तिला बाहेर काढण्यात अडचणी येतील, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे, मगरींना अटकाव करण्यासाठी खणलेला चर आता पालिकेची डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.