येत्या पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडू नयेत म्हणून मुंबई महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. हमी कालावधीत नसलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी निविदा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असून निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. रस्त्यावर खड्डे राहू नये म्हणून पावसाळ्यापूर्वी मुंबईतील सगळ्या रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांमुळे मुंबई महापालिकेवर टीका होत असते. दरवर्षी खड्डे भरण्याच्या कामामध्ये नवनवीन प्रयोग होत असतात. यंदा पालिका प्रशासनात मोठ्या पदावर मोठे फेरबदल झाले आहेत. पालिका आयुक्त पदी नुकतेच भूषण गगराणी आले असून अतिरिक्त आयु्क्त पदी अभिजीत बांगर यांची नियुक्ती झाली आहे. येत्या पावसाळ्यात या दोन्ही नव्या अधिकाऱ्यांची कसोटी लागणार आहे. पावसाळा अगदी तोंडावर आला असून दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या समस्या मुंबईकरांना यंदा भेडसावू नयेत म्हणून प्रशासनाने आतापासूनच नियोजनाला सुरूवात केली आहे. रस्त्यावरील खड्डे, नालेसफाई, पर्जन्यजल वाहिन्या हे पावसाळ्याच्यादृष्टीने महत्त्वाचे असलेले विषय अतिरिक्त आयुक्त बांगर यांच्याकडे आहेत. त्यामुळे या दोन्ही नवीन अधिकाऱ्यांनी या सर्व विषयांचे नियोजन करण्यास आणि आढावा बैठक घेण्यास सुरूवात केली आहे. त्यातच सध्या लोकसभेची आचारसंहिता लागलेली असल्यामुळे कोणतीही कामे करताना आचारसंहिता भंग होणार नाही याचीही विशेष काळजी घेतली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या स्तरावर परिमंडळ निहाय बैठका घेतल्या जात आहे. त्यात पालिका अधिकाऱ्यांना विविध विषयांवर निर्देश दिले जात आहेत.

हेही वाचा >>> मुंबई: बेस्ट बसमधील ६४ हजार फुकट्या प्रवाशांची धरपकड; ४० लाख रुपये दंड वसूल

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी गेल्यावर्षी जानेवारी २०२३ मध्ये पालिकेने ६००० कोटींची कामे दिली होती. मात्र त्यातील शहर विभागातील कामे सुरुच झालेली नाहीत. तर उपनगरातील कामेही धीम्या गतीने सुरू आहेत. रस्ते कॉंक्रीटीकरणाचा वेग मंदावलेला असल्यामुळे खड्डेमुक्त रस्ते हे स्वप्न दूरच राहिले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही रस्त्यावर खड्डे पडू नयेत किंवा ते वेळीच बुजवले जावे याचे पथ्य पाळताना पालिका प्रशासनाची कसोटी लागणार आहे. जे रस्ते हमी कालावधीत आहेत त्या रस्त्यांवरील खड्ड्यांची जबाबदारी कंत्राटदारावरच असली तरी उर्वरित रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पालिका प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या आधीच मुंबईतील सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करा असे आदेश आयुक्तांनी परिमंडळांच्या आढावा बैठकीत दिले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> Lok Sabha Election 2024 : पराभवाच्या भीतीमुळे भाजपची उत्तर मध्य मुंबईत सावध भूमिका?

बारा तासातच खड्डे बुजवण्याचे लक्ष्य ठेवा …

खड्डे पडले तरी ते वेळेतच बुजवावे याकरीता यंत्रणा सक्षम करण्यावर आपला भर असेल अशी प्रतिक्रिया अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. खड्डे पडले तरी ते सात आठ दिवस तसेच राहिले तर त्यामुळे लोकांना अधिक त्रास होईल. त्यामुळे खड्डे पडल्यानंतर ते तत्काळ बुजवण्याचा प्रयत्न असेल. आतापर्यंत २४ ते ४८ तासात खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले जात होते. मात्र १२ तासातच खड्डे बुजवण्याचे उद्दीष्ट्य ठेवा असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.