मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी प्रतिनिधीपदासाठी (यूआर) होणाऱ्या निवडणुकीला लाच, दहशत, अपहरण आदी गैरप्रकारांचे ग्रहण लागले असल्याचे सोमवारी पुन्हा अधोरेखित झाले. या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या तीन विद्यार्थिनींनी आपल्याला अमुकच एका उमेदवाराला मतदान करावे यासाठी काही लाख रुपयांचे आमिष दाखविले जात असून तसे न केल्यास अपहरणाची धमकी देण्यात आल्याची लेखी तक्रार कुलगुरुंकडे केली आहे. त्यामुळे विद्यार्थी निवडणुकीवरील पक्षीय राजकारणाचे रंग गडद होत असल्याचे चित्र समोर आले आहे.
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालये व विभागांमधून १५ जणांचे विद्यापीठ प्रतिनिधी मंडळ नेमले जाते. यंदा या विद्यार्थी प्रतिनिधी मंडळात १४ जण आहेत. या मंडळातून दरवर्षी विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून अध्यक्ष आणि सचिवाची निवड केली जाते. यंदा अध्यक्ष आणि सचिवाची निवड करण्यासाठी १५ जानेवारीला निवडणूक होणार असून अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी होती. या निवडणुकीत मनसेप्रणीत मनविसे आणि काँग्रेसप्रणीत एनएसयूआय या दोन विद्यार्थी संघटना परस्परांविरुद्ध उभ्या आहेत. तर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवासेनेने या निवडणुकीतून अनपेक्षित माघार घेतली आहे.
या निवडणुकीत मतदार असलेल्या वेंगुल्र्यातील हर्षदा तोरसकर तसेच मुंबईतील भाग्यश्री सावंत आणि तृप्ती येडेकर या विद्यार्थिनींनी आपल्याला विशिष्ट उमेदवाराला मतदान करण्यासाठी २ ते ४ लाख रुपयांचे आमिष दाखविण्यात आले आणि न ऐकल्यास पळवून नेण्याची धमकी देण्यात आली, अशी लेखी तक्रार थेट कुलगुरू राजन वेळुकर यांच्याकडे केली आहे. या पत्राची प्रत कुलपती राज्यपालांकडेही पाठविण्यात आली आहे.
आम्ही कोणत्याच पक्षाच्या बाजूने अथवा विरोधात नाही. त्यामुळेच आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. अशा प्रकारे मतदान घेण्याऐवजी ही निवडणूकच रद्द करावी आणि सर्वाना एकत्रित काम करू द्यावे.
भाग्यश्री सावंत
धमकी देण्याची आम्हाला गरज नाही. बहुतांश विद्यार्थी आमच्याच आहेत आणि मुळात मुलांना दिल्लीतून दूरध्वनी येतो आहे. आमचे दिल्लीत कुणीच नाही, ज्यांचे आहेत त्यांनाच जाऊन विचारा हे काय चालले आहे
सुधाकर तांबोळी, मनविसे कार्यकर्ता
अशा धमक्या देणे ही आमची संस्कृती नाही. उलट आम्ही तर खुल्या मतदानाच्या बाजूचे आहोत. तसे झाले तर निवडणुकीतील हे गैरप्रकार थांबतील.
– सूरज ठाकूर,
मुंबई अध्यक्ष, ‘एनएसयूआय’
आम्ही या तक्रारींची अतिशय गांभिर्याने दखल घेतली आहे. या विद्यार्थिनींना चर्चेसाठी बोलावून घेतले आहे. त्यांना येणे शक्य नसेल तर आम्ही या मुलींच्या घरी जाऊन बोलू.
– मृदुल निळे, संचालक,
विद्यार्थी विकास विभाग, मुंबई विद्यापीठ