भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि मनसे युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मनसेच्या परप्रांतियांबाबतच्या भूमिकेवर चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा सुरु होती. दरम्यान, आज चंद्रकांत पाटील यांनी सकाळी साडेअकरा वाजता राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ४ दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत, असे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपा-मनसे युती होणार का?, याकडे राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष लागले आहे. जवळपास ४० मिनटं चंद्रकांत पाटलांनी राज ठाकचे यांच्यासोबत चर्चा केली. भविष्यात भाजपा-मनसे युती होणार का? या चर्चेवर मनसेनेते बाळा नांदगावकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “यापुर्वी उत्तर भारतीयांवरील भाषणाचा काही क्लिप राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांना पाठवल्या होत्या यावर दोघांमध्ये चर्चा झाली असेल. तो माझा विषय नाही. तो राज ठाकरेंचा विषय आहे”, असे नांदगावकर म्हणाले. भविष्यात भाजपा-मनसे युती होणार का? यावर बाळा नांदगावकर म्हणाले, “राजकारणात काय होईल हे आता सांगू शकत नाही पण राजकारणात कधीही काहीही होते, हे निश्चित आहे”. बाळा नांदगावकर म्हणाले, “चंद्रकांत पाटील जेव्हा आले आणि गेले तेव्हा ते आनंदात होते. त्यांनी माझ्या कानात देखील काहीतरी सांगितले. ते मी सांगू शकत नाही. पण सगळ सकारात्मक होत. कारण आम्ही नकारत्मक विचार नाही करत. आम्ही एकटे लढत होतो तेव्हाही सकारात्मक होतो आणि आताही आहोत.”