‘लोकमाता अहिल्याबाई होळकर एन इटरनल फ्लेम’ कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई : ‘भारताची संस्कृती व सांस्कृतिक मूल्ये आणि भारताच्या संस्कृतीचे निरनिराळे अंग हे विविध आक्रमणांमध्ये नष्ट करण्यात आले होते. या सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींचे पुनर्निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर होत्या. त्यामुळे भारताच्या इतिहासामध्ये त्यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्याचा आणि न्यायाचा विचार समाजापुढे मांडला. राजा हा न्यायप्रिय, समाजाच्या सर्वच स्तरातील लोकांना सोबत घेऊन चालणारा आणि त्यांची काळजी करणारा असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या विचारांना पुढे नेण्याचे काम अहिल्याबाई होळकर यांनी संपूर्ण आयुष्यभर केले’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स म्हणजेच ‘एनसीपीए’च्या ‘पेज टू स्टेज’ उपक्रमाअंतर्गत तसेच सोशल स्टडीज फाउंडेशनतर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांचा जीवनप्रवास उलगडून दाखविणाऱ्या ‘लोकमाता अहिल्याबाई होळकर – एन इटरनल फ्लेम’ या कॉफी टेबल पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवार, २८ मे रोजी नरिमन पॉईंट येथील ‘एनसीपीए’मधील टाटा सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कॉफी टेबल पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
यावेळी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष अॅड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्याोजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाच्या (मॅट) अध्यक्ष व निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर, लेखक, कवी आणि सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे (सेन्सॉर बोर्ड) अध्यक्ष प्रसून जोशी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांनी गीत सादरीकरणातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कॉफी टेबल पुस्तकाचे लेखन व संपादन ज्येष्ठ पत्रकार व लेखक अंबरीश मिश्र यांनी केले असून हिंदी अनुवाद सत्यप्रकाश मिश्र यांनी केला आहे. हे पुस्तक इंग्रजी व हिंदी भाषेत उपलब्ध आहे.
दरम्यान, अहिल्याबाई होळकर यांचे जीवनकार्य व शौर्यगाथा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘लोकमाता अहिल्याबाई होळकर – एन इटरनल फ्लेम’ या कॉफी टेबल पुस्तकाच्या प्रती विकत घेऊन भारतातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र व मध्यप्रदेशचे सर्व मंत्री आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांना देणार आहे. तसेच अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित एक भव्य आणि चांगला व्यावसायिक चित्रपट तयार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
महिला सक्षमीकरणासाठी काम : अन्नपूर्णा देवी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत देश महिला सक्षमीकरणात प्रगतीशील कार्य करीत आहे. विविध क्षेत्रात महिलांची यशस्वी घौडदौड सुरु असून महिला उद्याोजकांची संख्यांही उत्तरोत्तर वाढत आहे. त्यामुळे भारत जगातील सर्वात चौथी मोठी अर्थव्यवस्था होण्यामध्ये महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. विविध क्षेत्रांसह राजकीय क्षेत्रात महिलांचे प्रमाण व भागीदारी वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. नेतृत्व आणि मातृत्व हे एकत्र मार्गक्रमण करु शकते, हे अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे. त्यांच्या नीतीनुसार महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार काम करीत आहे. तसेच, पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला हा मानवतेपेक्षा आपल्या सहनशीलतेची परीक्षा घेणारा होता. परंतु ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देशाच्या सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले, शूर महिला सैनिकांनीही मोठे धाडस दाखवत रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, हे दाखवून दिले. तसेच भारतीयांच्या सुरक्षा व सन्मानासाठी भारत कोणतीही जोखीम स्वीकारायला तयार असल्याचे संपूर्ण जगाला दाखवून दिले, असे केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी सांगितले.
पहाटेचा शपथविधी, ७२ तासांचे मुख्यमंत्रीपद विसरू शकत नाही : फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा परिचय करून देताना ते दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, असा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर स्वत:चे मनोगत व्यक्त करीत असताना, मी दुसऱ्यांदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, असा उल्लेख करण्यात आला. मात्र मी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालो आहे, ही गोष्ट तुम्ही विसरले. मात्र मी पहाटेचा शपथविधी आणि माझे ७२ तासांचे मुख्यमंत्रीपद कधीच विसरू शकत नाही, याची तुम्हाला आठवण करून देतो, असे फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.