मुंबई : ‘इंडिगो एअरलाईन्स’च्या देशभरातील सुमारे २६ हजार कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळा वेतनवाढ देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आणि अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

विमानतळावरील विविध कंपन्यांच्या कामगारांच्या अनेक समस्या गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित होत्या. ‘इंडिगो एअरलाईन्स’च्या कर्मचाऱ्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या मागण्यांबाबत भाजपच्या माध्यमातून कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली, असे चव्हाण यांनी नमूद केले.