अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीची मागणी; नौका मालकांनादेखील अनुदान हवे

पावसाळ्यातील मासेमारीच्या काळात चक्रीवादळे, अतिवृष्टी आल्याने मच्छीमारांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांप्रमाणेच २५ हजारांची मदत आणि नौका मालकांना एक लाख रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी ‘अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती’ने केली आहे.

पावसाळ्यात १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारीस बंदी असते. तर अनेक पारंपरिक मच्छीमार १५ ऑगस्टपर्यंत मासेमारीस समुद्रात जात नाहीत. यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाला आणि त्यानंतर अनेक वेळा अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळे आणि अतिवृष्टीमुळे मासेमारी करण्यास समुद्रात न जाण्याचे इशारे देण्यात आले. मासेमारीस जाताना बर्फ, डिझेल, शिधा आणि इतर साहित्य घेऊन गेलेल्या मच्छीमारांना अनेकदा किनाऱ्यावरूनच परत फिरावे लागले. तर वादळामध्ये अडकलेल्या नौकांचे आणि सामग्रीचे बरेच नुकसान झाले. चक्रीवादळाचा फटका किनाऱ्यांनादेखील बसल्यामुळे सुकवत ठेवलेल्या मासेदेखील नुकसान झाले. या सर्व नुकसानीचा योग्य तो विचार करून पंचनामे व्हावेत, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केली आहे. मच्छीमारांच्या मागण्यांसदर्भात तांडेल यांनी मंगळवारी राज्याचे मत्स्य व्यवसाय आयुक्त राजीव जाधव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

पंचनामे करा

हवामानातील बदलामुळे यावर्षी खूप नुकसान झाले असून खर्चदेखील निघालेला नाही. त्यामुळे प्रत्येक मच्छीमारास २५ हजार रुपये नुकसाभरपाई द्यावी आणि नौका मालकांना एक लाख रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आल्याचे तांडेल यांनी सांगितले. मत्स्य व्यवसाय विभागाने लवकरात लवकर पंचनामे करून मच्छीमारांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी समितीतर्फे करण्यात आली.