राष्ट्रवादीला २२ जागा सोडणे योग्य होणार नाही, अशी भूमिका राज्यातील काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांच्याकडे मांडल्याने त्याची तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादीमध्ये उमटली आहे. काँग्रेसची इच्छा असल्यास जरूर स्वबळावर लढा, असा सल्लाच राष्ट्रवादीने मंगळवारी काँग्रेसला दिला. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये या उद्देशानेच आघाडी कायम ठेवण्याचा निर्णय दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. केंद्रातील अनेक मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप होत आहेत. विरोधी पक्ष त्यावरून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा वेळी आघाडीत एकवाक्यता ठेवून लढणे आवश्यक आहे. पण जागावाटपाच्या मुद्दय़ाला काँग्रेसने जास्तच महत्त्व दिले आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.