मुंबई : भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी भाजपच्या ३० ते ४० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच, १४ जणांना ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने अपमान केल्याचा दावा करत भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या मुख्यालयावर गुरुवारी हल्ला केला.

भाजपच्या युवा मोर्चाचे कार्यकर्ते गुरुवारी प्रेस क्लब येथील काँग्रेसच्या कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांनी सुरुवातीला राहुल गांधी यांच्या प्रतिमेवर शाईफेक केली. त्यानंतर तेथील खुर्च्या फेकून देण्यात आल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात दगडही फेकून मारले. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), १८९(१)(क),१८९(२), १८९(३), १९०, १९१(२), १९२, ३२४, ३३३ तसेच मुंबई पोलीस कायदा कलम १३५ अंतर्गत तेजिंदर तिवाना व ३० ते ४० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा – ‘मेरिटाईमच्या कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी करावी’

हेही वाचा – स्पीड बोटींचा स्वैरसंचार, अतिधाडस; अलिबाग, घारापुरीसाठी सुरक्षित जलमार्ग निश्चित करण्याची पर्यटकांची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेस भवनचे कार्यकारी अध्यक्ष मंदार पवार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी १४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेरही घोषणाबाजी केली. या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा काँग्रेस कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आला. यावेळी पोलिसांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्जही करण्यात आला.