आकडेवारीनुसार बघायला गेल्यास आमचे सरकार आल्यावर राज्यातील गुन्हेगारी कमी झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र, आकडेवारीनुसार गुन्हेगारीचे आकलन करणे बरोबर नाही, असे सांगून त्यांनी किती गुन्हेगारांना न्यायालयाकडून शिक्षा होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरते. आमच्या सरकारच्या काळात गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारला सत्तेवर येऊन सहा महिने झाल्यानिमित्त मंत्रालय पत्रकार संघातर्फे फडणवीस यांच्याशी वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्यातील गुन्हेगारी वाढत असून, राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असावा का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना त्यांनी गुन्हेगारी कमी झाली असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात गुन्हेगारांना शिक्षा होण्याची टक्केवारी अवघी ८ टक्के इतकी होती. आम्ही जाणीवपूर्वक ही टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न करीत आहोत. मागच्याच महिन्यात गुन्हेगारांना शिक्षा होण्याची टक्केवारी ३८ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असावा का, या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांनी टाळले.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असलेल्या चौकशीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ही चौकशी सुरू आहे. त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आम्ही करणार नाही. राष्ट्रवादीने या चौकशी विरोधात कोणतेही आरोप केले तरी सिंचनामध्ये जे घोटाळे झाले आहेत. त्याच्या पाळामुळांपर्यंत गेल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.
राज्यातील कॉल सेंटरमध्ये सध्या महिलांना रात्रपाळी करण्याची मुभा आहे. यापुढे कारखान्यांमध्येही महिलांना रात्रपाळीत काम करता यावे, यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.