अमित देशमुख यांचे निर्देश
मुंबई : मुंबईतील शिवडी, वरळी, वांद्रे, धारावी, सेंट जॉर्ज आणि माहीम अशा सहा किल्ल्यांसाठी एकत्रित विकास आराखडा तातडीने तयार करण्यात यावा, अशा सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या. गड-किल्ल्यासंदर्भातील आढावा बैठक मंत्रालयात अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
मुंबईतील सर्व सहा किल्ल्यांचा विकास आराखडा तयार करीत असताना तो एकत्रितपणे तयार करण्यात यावा. याबरोबरच राज्यातील एकूण सागरी किल्ल्यांसाठीही विकास आराखडा तयार केला जाणार आहे. या शिवाय राज्य संरक्षित अशा एकूण ६० किल्ल्यांचा विकास आराखडा असे तीन वेगवेगळे विकास आराखडे येत्या आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश देशमुख यांनी दिले. लातूर जिल्ह्यातील औसा आणि उदगीर किल्ल्यांच्या संवर्धन कामासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार या किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम सुरू करण्यात यावे. तसेच राज्यातील १८ संरक्षित किल्ल्यांसंदर्भात संवर्धनाबाबतची काय कामे करण्यात येत आहे याबाबतचा अहवालही तातडीने तयार करण्यात यावे, असेही निर्देश देशमुख यांनी दिले. महाराष्ट्रातील एकूण ६० किल्ले राज्य संरक्षित किल्ले म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या किल्ल्यांची डागडुजी, दुरुस्ती आणि संवर्धनाची कामे पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयामार्फत करण्यात येत आहेत. मात्र असे असले वित्तविषयक तज्ज्ञ सल्लागार नेमून या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वित्तसंस्थांकडून कर्जपुरवठा कसा होऊ शकेल याबाबतची शक्यता तपासून घेण्यात यावी. या तज्ज्ञ सल्लागारांनी दिलेला अहवाल शासनास त्यानंतर सादर करण्यात यावा, अशा सूचनाही या वेळी देशमुख यांनी दिल्या