मुंबई : राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही वा तशी प्राथमिक चर्चाही झालेली नसल्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी आमदारांच्या बैठकीत स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या दोन गटांचे विलिनीकरण करण्यात यावे, असा पक्षातील काही नेत्यांचा मतप्रवाह आहे. याचा निर्णय अजित पवार व सुप्रिया सुळे यांनी एकत्र बसून घ्यावा. मी या प्रक्रियेत नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात केले होते. यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये विलिनीकरणाची चर्चा सुरू झाल्याचे तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत होते. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांच्या बैठकीत यावर चर्चा झाली. तेव्हा अजित पवार यांनी या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.
दोन्ही गटाच्या विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही वा तशी प्राथमिक चर्चाही झालेली नाही. पक्षात फूट पडू नये या उद्देशानेच शरद पवारांनी विलिनीकरणाची चर्चा सुरू केल्याचेही अजित पवार गटाच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
‘शरद पवार निर्णय घेतील’
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत विलिनीकरणावर काही काळ चर्चा झाली. तेव्हा विलिनीकरणावर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच अंतिम निर्णय घेतील. पक्षाच्या कोणीही नेत्याने यावर मतप्रदर्शन करू नये, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. महायुती सरकारच्या काळात विविध शासकीय कार्यालयांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. त्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पर्दाफाश करण्याची सूचना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरिता जिल्हापातळीवर कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले. आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात यावा, असेही स्पष्ट करण्यात आले. पक्ष संघटनेत लवकरच फेरबदल केले जाणार आहेत. नवीन नियुकक्त्या तसेच आवश्यकतेनुसार पुनर्रचना करून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.