धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे सोमवारी विधान परिषदेचे कामकाज काहीवेळासाठी तहकूब करावे लागले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या ६५ वर्षांत धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱया सरकारने सकारात्मक पावले न उचलल्याची टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी केली. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी घोषणा देण्यास आणि गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यामुळे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ वर्षांत सत्तेवर असताना धनगर समाजाच्या आरक्षणाची आठवण का आली नाही, असा प्रश्न विरोधकांना विचारला. त्याचबरोबर आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना आपण स्वतः तिथे गेलो होतो, असेही त्यांनी सांगितले.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा मांडताना सांगितले की, संपूर्ण धनगर समाज मुंबईच्या रस्त्यावर उतरला आहे. तो कोणत्याही पक्षाचा किंवा विचारांचा नाही. मात्र, त्यांना जो शब्द देण्यात आलेला आहे. तो सरकारने पूर्ण करावा. धनगर समाजाच्या मतांमुळेच राज्यात सत्तापरिवर्तन झाले. आता या समाजाला वाऱयावर सोडू नका.
मुंडे यांच्या वक्तव्याला उत्तर देताना महादेव जानकर म्हणाले, धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पाच दिवसांपूर्वी सर्व सचिवांची बैठक बोलावली होती. या बैठकीला मी आणि गृहराज्यमंत्री राम शिंदेही उपस्थित होते. या बैठकीमध्ये आरक्षणासाठी आवश्यक सकारात्मक मुद्दे मांडण्यात आले आहेत. गेल्या ६५ वर्षांत धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱया सरकारकडून आरक्षणासाठी काहीही प्रयत्न करण्यात आले नाही. धनगर समाजाला आरक्षण मिळायला थोडा वेळ लागला तरी चालेल पण त्यावर पुढे कोणतीही आडकाठी येऊ नये.