सद्यस्थितीत धनगर समाजाला आरक्षण देणे शक्य नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठवलेल्या पत्रात लिहिल्याचा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.  भाजपा सरकारने धनगर समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्या आज मुंबईत अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या.
चर्चगेट स्टेशनजवळ अहिल्याबाई होळकर यांच्या आज २९०व्या जयंतीच्या कार्यक्रमात उपस्थित सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदी सरकारने धनगरांना आरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, पंतप्रधान मोदींनी सद्यस्थितीमुळे धनगर आरक्षण देणं अशक्य असल्याचे शरद पवार यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे .  मोदींच्या पत्रामुळे आता धनगर समाजात त्यांच्या विरोधात सूर उमटू लागले आहेत.