मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अमोल कीर्तिकर यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) पुन्हा समन्स बजावले असून त्यांना ८ एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. कीर्तिकर यांच्या वकिलांनी याप्रकरणी बुधवारी ईडीला पत्र पाठवून चौकशीला उपस्थित राहण्यासाठी वेळ मागितली आहे. खिचडी वितरणात कथित गैरव्यवहाराप्रकरणी कीर्तिकर यांना समन्स बजावण्यात आले आहे.

ईडीने अमोल कीर्तिकर यांना पुन्हा समन्स बजावले आहे. अमोल कीर्तिकर यांना ८ एप्रिल रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वीही अमोल कीर्तिकर यांना ईडीने समन्स बजावले होते. त्यावेळी त्यांना २७ मार्च रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यावेळी कीर्तिकर यांच्यावतीने त्यांचे वकील दिलीप साटले ईडी कार्यालयात आले होते. त्यानी ईडीला पत्र देऊन चौकशीला उपस्थित राहण्यासाठी वेळ मागितली आहे. समन्समध्ये अल्पाधिक उपस्थित राहण्यास सांगितले आहे. अमोल यांचे वडील खासदार गजानन कीर्तिकर हे सध्या शिंदे गटामध्ये आहेत. मात्र अमोल कीर्तिकर ठाकरे गटाच्या युवा सेनेचे पदाधिकारी आहेत.

हेही वाचा…ठाणे, नाशिक, यवतमाळचा तिढा कायम; शिंदे गटाची पहिली यादी जाहीर

खिचडी गैरव्यवहाराप्रकरणी १ सप्टेंबर रोजी फसवणूक, फौजदारी विश्वासघात, कट रचणे आदी कलमांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनील ऊर्फ बाळा कदम, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंके, सुजीत पाटकर, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागिदार व कर्मचारी, स्नेहा कॅटरर्स, तत्कालीन सहाय्यक आयुक्त (नियोजन), इतर पालिका अधिकारी व संबंधित खासगी व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सहा कोटी ३७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून याच गुन्ह्याच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करीत आहे. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेनेही अमोल कीर्तिकर यांची चौकशी केली होती.