मुंबई : सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) वरिष्ठ वकील प्रताप वेणूगोपाल यांना पाठवलेले समन्स मागे घेतले असून ईडीकडून याबाबत शुक्रवारी माहिती देण्यात आली. तसेच वकिलांना समन्स बजावताना ईडी संचालकांची मंजुरी घ्यावी, अशा सूचना ईडीच्या सर्व अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. याबाबत ईडीकडून कार्यालयीन परिपत्रक जारी करण्यात आले आहे. हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड प्रकरणात ईडी चौकशी करीत असून त्याबाबत ईडीने प्रताप वेणूगोपाल यांना समन्स बजावले होते.
ईडीच्या मुंबई कार्यालयाकडून मनी लॉन्डरिंग प्रकरणात चौकशी सुरू आहे. या प्रकरणात इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया यांचा नकार असतानाही १ मे २०२२ रोजी केअर हेल्थ इन्शुरन्स लिमिटेडचे समभाग एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन प्लानअंतर्गत अत्यंत कमी किमतीत जारी करण्यात आल्याचा आरोप आहे. त्या मागचे कारण व त्यावेळची परिस्थिती जाणून घेण्यासाठी केअर हेल्थ इन्शुरन्स लिमिटेडचे स्वतंत्र संचालक प्रताप वेणूगोपाल यांना समन्स बजावण्यात आले होते, असे ईडीकडून सांगण्यात आले. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने याबाबत कंपनीवर एक कोटींचा दंडही आकारला होता, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली.
प्रताप वेणूगोपाल यांना पाठवण्यात आलेल्या समन्सवरून वाद निर्माण झाल्यानंतर आता ईडीने त्यांना पाठवलेले समन्स मागे घेतले आहे. याबाबतची माहिती प्रताप वेणूगोपाल यांना देण्यात आली आहे. ईडीकडून त्यांना करण्यात आलेल्या पत्रव्यवहारात आवश्यक कागदपत्र ई-मेलद्वारे मागितले जातील, असे कळवण्यात आले आहे.
ईडीने सर्व विभागीय कार्यालयांसाठी मार्गदर्शक परिपत्रक जारी केले आहे. त्यात भारतीय साक्ष अधिनियम, २०२३ उल्लंघनाप्रकरणी कोणत्याही वकिलाला समन्स बजावू नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. अपवादात्मक परिस्थिती समन्स पाठवणे अत्यावश्यक वाटले, तर त्याबाबत ईडीच्या संचालकांची मंजुरी घ्यावी, असे परिपत्रकाद्वारे ईडीतील सर्व अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे.