राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईमध्ये ष्णमुखानंद हॉलमध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबतच नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष व जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अन्य मान्यवर नेते मंडळीही उपस्थित होती. शिवसेनेतील बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर फारुख अब्दुल्ला नेमकं काय म्हणाले यासंदर्भातील माहिती उद्धव ठाकरेंनीच आपल्या भाषणामध्ये दिली आहे.
नक्की वाचा >> “शरद पवार सोबत असल्यानंतर…”; ‘वादळं निर्माण करणारे’ असा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचं विधान; ‘लढाईच्या क्षणा’बद्दलही बोलले
उद्धव ठाकरे यांनी एका छोट्या भाषणामधून छगन भुजबळ आणि शिवसेनेच्या नात्यावर भाष्य करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे भाषण करत असताना सर्व मान्यवर मंडळी मंचावरच बसलेली होती. भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंनी येथे बरीच ज्येष्ठ मंडळी उपस्थित असल्याचं सांगत अब्दुल्ला यांचा उल्लेख केला. माझी आणि अब्दुल्ला यांची भेट फारशी होत नाही असं उद्धव यांनी सांगितलं. यामागील दोन महत्त्वाची कारण देताना त्यांनी अब्दुल्ला यांचं वय झालं आहे असं सांगतानाच दुसरं कारण हे महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीर फार दूर असल्याचं म्हटलं.
नक्की वाचा >> दीड वर्षांपूर्वीच ठाकरे कुटुंबाला लागलेली शिंदेंच्या बंडाची चाहूल? आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, “आमच्या घरात…”
अब्दुल्ला यांची बऱ्याच दिवसांनी भेट झाल्याचं उद्धव यांनी नमूद केलं. “आल्या आल्या मला म्हणाले की अजिबात घाबरु नकोस. लढ वडीलांसारखा लढ!,” असं उद्धव ठाकरेंनी भाषणादरम्यान म्हटलं. आम्ही लढत राहणार आहोत असंही उद्धव यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे त्यांनी शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते सोबत असताना मी लढाईच्या क्षणाचीच वाट पाहतोय असं विधानही केलं.