मुंबई : मुंबईमधील भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र परिसरात बुधवारी एका सोनेरी कोल्ह्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून या कोल्ह्याने परिसरातील एका महिलेवर हल्ला केला होता. दरम्यान, चेंबूर परिसरात सोनेरी कोल्ह्याने सोमवारी तरुणावरही हल्ला केला होता.

भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र परिसरात बुधवारी एका महिलेवर सोनेरी कोल्ह्याने हल्ला केल्याची घटना घडली. समोरून आलेल्या कोल्ह्याने अचानक महिलेवर हल्ला केला. महिलेला तातडीने रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. दरम्यान, जेरबंद केलेल्या सोनेरी कोल्ह्याला रेबीजची लागण झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. चेंबूर परिसरात सोमवारी एका तरुणावर सोनेरी कोल्ह्याने हल्ला केला होता. तसेच नोव्हेंबरमध्ये एका सोनेरी कोल्ह्याचा रेबीजमुळे मृत्यू झाला होता. त्या कोल्ह्याने परिसरातील एका लहान मुलावर हल्ला केला होता. त्याच्यावर वेळीच वैद्यकीय उपचार केल्याने धोका टळला.

हेही वाचा…Gateway Of India Boat Accident : स्पीडबोटची टक्कर आणि एलिफंटाला जाणारी ‘नीलकमल’ बोट बुडाली, नेमका कसा झाला अपघात?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, चेंबूर परिसरात आतापर्यंत रेबीजची लागण होऊन तीन कोल्ह्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे वनविभागाने चेंबूर परिसरात जनजागृती मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. वनविभागाने भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र (बीएआरसी) आणि आसपासच्या परिसरात मॅपिंग सुरू केले असून, सोनेरी कोल्ह्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅपिंग करण्यास सुरुवात केली आहे. तसेच ठाण्याचे उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली वन्यप्राण्यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये सहाय्यक वनसंरक्षक दत्तात्रेय मिसाळ, सोनल वळवी, ज्ञानेश्वर रक्षे, तसेच रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या नेहा पंचमिया, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले यांचा समावेश आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात एका सोनेरी कोल्ह्याचा रेबीजमुळे मृत्यू झाला होता. मुंबईमध्ये रेबीजची लागण होऊन वन्यप्राण्याचा मृत्यू झाल्याची ही पहिली नोंद होती. त्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्येही रेबीजची लागण होऊन दोन सोनेरी कोल्ह्यांचा मृत्यू झाला होता.