उत्तरपत्रिका घोटाळा प्रकरण
मुंबई विद्यापीठातील अभियांत्रिकी घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर विद्यमान अधिकाऱ्यांसह काही माजी अधिकाऱ्यांची चौकशीही करण्यात येणार आहे. परीक्षा विभागात नवी पध्दत आणल्यापासून त्याच्याशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना याआधी घोटाळ्याचे प्रकार घडले होते का, याची माहिती घेण्यात येणार आहे. चौकशीदरम्यान, अनेक अधिकाऱ्यांची नावे पोलिसांकडे सातत्याने येत असून त्याचा खुलासा करण्यासाठीही काही अधिकाऱ्यांची चौकशी होईल, असे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.
अभियांत्रिकी विभागातील उत्तरपत्रिका परीक्षा भवनातून बाहेर काढत ते विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी देत त्यांच्याकडून पैसे कमाविण्याच मार्ग विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी शोधला होता. मात्र, हे प्रकार नेमके किती वर्षांपासून सुरु आहे, याचा अंदाज काही केल्या पोलिसांना येत नाहीये. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी २०१५ मध्येही अशाप्रकारे काही विद्यार्थ्यांची मदत केल्याचे सांगितले असले तरी विद्यार्थी संख्या मात्र, आठवत नसल्याचे आरोपी पोलिसांना सांगत आहेत. उत्तरपत्रिका परीक्षा विभागात आणल्यानंतर त्याचे स्कॅनिंग होण्यासाठी लागणाऱ्या विलंबाचा फायदा हे कर्मचारी घेत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंगचे तंत्र २०१३ साली विद्यापीठात आणण्यात आले. संपूर्ण प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी तसेच समजून घेऊन त्यातील पळवाटा जाणून हे प्रकार सुरु झाले असावे, असा कयास पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षा विभागाशी संबंधित सर्व आजी-माजी अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलीस दलातील सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
पोलिसांकडे अनेक सूचना
विद्यापीठाची उत्तरपत्रिका वितरणापासून ते परत आणणे, स्कॅनिंग करणे ही प्रक्रिया काहीशी गुंतागुंतीची असून पोलीस ही प्रक्रिया समजून घेत तपास करत आहेत. विद्यापीठाच्या कोणत्या विभागाची चौकशी केल्यावर कोणती माहिती मिळेल, कोणता विभाग भ्रष्ट आहे, अशाप्रकारच्या सूचनांचा पाऊस पडत आहे.
विद्यार्थ्यांची चौकशी
मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकी घोटाळ्यात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांची भांडुप पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. फरार असलेला एक आरोपी सात दिवसांपूर्वी घर सोडून पळून गेला
आहे.
सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसह चौकशीला येण्यास सांगण्यात येणार असून काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा अजूनही सुरु असून त्या संपल्यानंतर त्यांना बोलावण्यात येणार आहे. अभियांत्रिकी शाखेच्या उत्तरपत्रिका १५ ते २० हजार रुपये देऊन परीक्षा भवनातून कर्मचाऱ्यांच्या मदतीने मिळवून त्या लिहून परत देण्यात येत असल्याचा घोटाळा भांडुप पोलिसांनी २० मे रोजी उघडकीस आणला
होता. या घोटाळ्यात आतापर्यंत आठ जणांना अटक केली असून ८० विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका पैसे देऊन मिळविल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.