अनिश पाटील, लोकसत्ता

मुंबई : राज्यातील नव्याने स्थापन झालेल्या सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री पद देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील आमदाराकडे १०० कोटी रुपयांची मागणी केल्याच्या आरोपाखाली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौघांना अटक केली. आरोपी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदारांना भेटले होते. आरोपींनी आणखी कोणाची अशा प्रकारे फसवणूक केली आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

रियाज अल्लाबक्ष शेख (वय ४१, कोल्हापूर), योगेश मधुकर कुलकर्णी (वय ५७, पाचपाखाडी, ठाणे), सागर विकास संगवई (वय ३७, पोखरण रस्ता, ठाणे) व जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी (वय ५३, नागपाडा, मुंबई) अशी अटक आरोपींची नावे आहेत. 

आमदारांच्या खासगी सचिवांच्या तक्रारीवरून या प्रकरणी खंडणीविरोधी पथकाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. तक्रारदार आकाशवाणी आमदार निवास येथे असताना रियाजने दूरध्वनी करून मी दिल्लीवरून आलो असून साहेबांशी बायोडेटाबद्दल बोलायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर तीन ते चार वेळा आरोपीने आमदाराच्या सचिवाला दूरध्वनी केला. त्यापूर्वी १२ जुलैला आरोपीने आमदाराला दूरध्वनी करून मी एका मोठय़ा नेत्याच्या संपर्कात असून मंत्रिमंडळात मंत्री पद देण्यासाठी १०० कोटी रुपये मागितल्याचे सांगितले. त्यानंतर १७ जुलैला आरोपीने ऑबेरॉय हॉटेलमध्ये आमदारांची भेट घेतली. त्या वेळी मंत्रिमंडळात सहभागासाठी ९० कोटी रुपये मागत असून त्यातील २० टक्के रक्कम म्हणजे १८ कोटी रुपये उद्या द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर आरोपीने सोमवारी नरिमन पॉइंट परिसरात आमदाराला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर पैसे घेण्यासाठी आमदाराने त्यांना ऑबेरॉय हॉटेलमध्ये नेले. तेथे  पोलिसांनी रियाजला ताब्यात घेतले आणि या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून रियाजला अटक करण्यात आली. या प्रकरणी कुलकर्णी व संगवई यांचा सहभाग आढळल्यानंतर त्यांनाही अटक केली. चौकशीतील माहितीनुसार, रियाजची कुलकर्णीमार्फत संगवईशी ओळख झाली होती. त्याने दिल्लीतील व्यक्तीच्या माध्यमातून ५० ते ६० कोटी रुपयांमध्ये मंत्री पद मिळवून देईन असे सांगितले होते. पुढे या प्रकरणी नागपाडय़ातून उस्मानीलाही अटक केली. आरोपीने अशा पद्धीतीने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.