एका एकोणीस वर्षांच्या पीडित तरुणीचे अपहरण करून तिला बेदम मारहाण आणि नंतर तिच्यावर नवी मुंबईतील खारघर येथे दोन दिवस सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या चार जणांना रायगड जिल्ह्य़ातील पेण व सातारा येथील पाचगणीमधील गोठेघर गावातून अटक केली आहे. जितू निषाद, विकास निकम, गोलू ऊर्फ प्रसाद रंगीला, बाल्या ऊर्फ रोहित फाणके अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात यापूर्वीच ममता निषाद, वासुबाई गणोते, संतोष गणोते, मुन्ना रॉय यांना अटक करण्यात आली आहे. जितू हा विवाहित असून त्याचे ममताबरोबर लग्न झाले आहे. जितूचे एका तरुणीबरोबर प्रेम असल्याची माहिती पत्नी ममताला मिळाली होती. जितूने मैत्रिणीला बदलापूर येथे ठेवले होते. तेथे तिचा ममताला शोध लागला. ममता व तिच्या कुटुंबीयांनी तिने जितूचा नाद सोडावा म्हणून तेथे मारहाण केली. तिला ममताच्या माहेरी डोंबिवलीत आजदेपाडा येथे आणले. तेथून तिला गोलू, बाल्या आणि विकास यांनी खारघर येथे नेऊन तिच्यावर दोन दिवस बलात्कार केला. तिला पुन्हा आजदेपाडा येथे सोडले. तरुणीने मानपाडा पोलीस ठाणे गाठल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला.