राज्यभरात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं आहे. मागील १० दिवस ज्या बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा केली, त्या बाप्पाला निरोप देताना अनेकांना भावना अनावर झाल्या होत्या. पुणे आणि मुंबईत या मिरवणुकांना विशेष महत्त्व असून राज्यभरातील नागरिक बाप्पाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी विसर्जन स्थळी गर्दी करत होते. पुण्यात मानाच्या पाच गणपतींनंतर इतर गणपतींचे विसर्जन केले जात आहे. सकाळी १०.३० च्या सुमारास मंडई येथून निघालेल्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन चार वाजण्याच्या सुमारास करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक खेळांचे सादरीकरण करत आपल्या लाडक्या बाप्पाला भाविकांनी निरोप दिला. तर मुंबईतही लालबागचा राजा, तेजुकायाचा गणपती, गणेशगल्लीचा राजा, परळचा राजा यांची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आल्या. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण मोठ्या उत्साहाने यात सहभागी झाल्याचे चित्र दिसत असून राज्यभरात या मिरवणुकांमध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवणयात आला.