मुंबई : मुंबईमध्ये सोमवारी सकाळपासून पावसाने जोर धरला असून ठिकठिकाणचे सखलभाग जलमय होऊ लागले आहेत. मुसळधार पाऊस कोसळत असतानाच गिरगावातील मेट्रो ३ स्थानकाचे काम सुरू असलेल्या ठिकाणचा रस्ता अचानक खचला. खचलेल्या रस्त्यात बेस्टची बस अडकल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यातच सकाळी ९.३० च्या सुमारास ठाकूरद्वार चौकानजिक डॉ. बाबासाहेब जयकर मार्गावरील काही भाग खचला. मेट्रो ३ मार्गिकेवरील गिरगाव स्थानकाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बॅरिकेड्सच्या अगदी जवळून बस जात असतानाच रस्ता खचला. बसचे मागचे एक चाक या खड्ड्यात अडकले. त्यामुळेबस जागीच तिरकी अडकून पडली. परिणामी, बसमधील प्रवाशांना मध्येच उतरावे लागले. सकाळी वर्दळीच्या वेळी रस्त्यातच बस अडकून पडल्यामुळे वाहतूक कोंडीही झाली होती.

ही बस १२१ क्रमांकाच्या बसमार्गावरील बॅकबे आगारातील होती. बॅक बे येथून ही बस जे. मेहता मार्गच्या दिशेने जात असताना सकाळी ९.३० वाजता ठाकूरद्वार सिग्नलजवळ ही घटना घडली. या घटनेत कोणतीही प्रवासी जखमी झाले नाही, असे बेस्ट प्रशासनाचे म्हणणे आहे. घटनास्थळी टोइंग व्हॅन दाखल झाली आणि बस खड्ड्यातून बाहेर काढून आगारामध्ये नेण्यात आली. मुंबईमध्ये २६ मे रोजी पडलेल्या पावसात वरळी येथील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात पाणी शिरले होते. आता गिरगावमधील मेट्रो स्थानकालगतचा रस्ता खचल्याने पुन्हा एकदा मेट्रो ३ मार्गिका चर्चेचा विषय बनली आहे.

दरम्यान, याबाबत मुंबई मेट्रो रेल्वे प्रशासनाने (एमएमआरसीएल) प्रसिद्धी पत्रक जारी केले असून गिरगाव येथे प्रस्तावित पुनर्वसन इमारतीच्या तळघरात पाणी झिरपत असल्याचे आढळून आले आहे. इमारतीच्या बांधकामाजवळच कुठे तरी पाणी गळती होत असल्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. जमिनीचा काही भाग खचून खाली पोकळी निर्माण झाली. त्यामुळे ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मेट्रो प्राधिकरणाचे अधिकारी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत असून नक्की गळती कशामुळे होत आहे याचा शोध सुरू आहे. पाणीपुरवठा वहिनी, सांडपाणी वहिनी किंवा पर्जन्य जलवाहिनी यापैकी नेमकी कशातून गळती होत आहे ते शोधून दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे एमएमआरसीएलचे म्हणणे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रभावित रस्त्याचा भाग लवकरात लवकर दुरुस्त करून पूर्ववत करण्याचे काम सुरू असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायही करण्यात येत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.