आझाद मदान! मुंबईच नाही, तर महाराष्ट्रातल्या अनेक आंदोलनांचं हक्काचं ठिकाण, बॉम्बे जिमखान्यापासून प्रेस क्लब ऑफ इंडियापर्यंत अनेक संस्थांचं आश्रयस्थान आणि मुंबईतील ‘खड्डस क्रिकेट’ची पंढरी.. या मदानात बाराही महिने चाललेल्या आंदोलनांचा, घटनांचा आढावा घेणारं हे पाक्षिक सदर ‘आझाद मदानातून’!

१५ ऑक्टोबर १८५७! कधीही सूर्य न मावळणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याच्या पूर्वेकडील ‘लंडन’मध्ये म्हणजेच मुंबईत त्या दिवशी खळबळ उडाली. देशभरात पेटलेला बंडाचा वणवा मुंबईच्या वाटय़ाला आला नव्हता. तरीही मुंबईतील दोन सोजिर या बंडात सहभागी असल्याचं ब्रिटिश सरकारला आढळलं. या दोघांना तोफेच्या तोंडी करकचून बांधण्यात आलं. तोफेला बत्ती देण्यात आली आणि त्या दोघांच्या कलेवरांच्या चिंध्या होऊन धुळीत पडल्या.. जुलमी ब्रिटिश साम्राज्याने मुंबईकरांना दिलेला तो इशारा होता. त्या इशाऱ्याचा धडाकेबाज आवाज घुमला होता एस्प्लनेड ग्राऊंडमध्ये किंवा परेड ग्राऊंडमध्ये म्हणजेच आजच्या आझाद मदानात!

arun govil bj merrut
निवडणूक रणसंग्रामात ‘राम नाम’ नाही, तर ‘या’ नावांची घोषणा; छोट्या पडद्यावरील रामाचा विजय होणार का?
Bachhu Kadu amravati rally
अमरावतीमध्ये राडा; अमित शाह यांच्या सभेला बच्चू कडूंचा विरोध, पोलिसांसमोर ठिय्या
External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
sunita kejriwal kalpana soren and sonia gandhi present in india bloc maharally
रामलीला मैदानावर ‘इंडिया’ची नारीशक्ती; सुनीता केजरीवाल, कल्पना सोरेन आणि सोनिया गांधी यांची उपस्थिती

आग लागली अन्..

आझाद मदान! एरवी पाय ठेवायलाही मोकळी जागा नसलेल्या मुंबईच्या उदरातील हे प्रशस्त मदान! दक्षिण मुंबईच्या मध्यभागी असलेला २५ एकरचा परिसर मदान म्हणून राखीव ठेवण्यात आला होता. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात एवढी मोठी जागा मोकळी ठेवण्यामागे कारणही तसंच खास होतं. ‘मुंबई गं नगरी बडी बाका, जशी रावणाची दुसरी लंका’, असं मुंबईचं वर्णन पठ्ठे बापूरावांनी त्यांच्या मुंबईच्या लावणीत केलंय. मुंबईला रावणाची दुसरी लंका म्हणण्यामागे मुंबईची त्या काळची सुबत्ता तर होतीच; पण कदाचित मुंबईला लागलेल्या भयानक आगीमुळेही पठ्ठे बापूरावांना ती रावणाची लंका भासली असावी. फेब्रुवारी, १८०३ मध्ये मुंबईत भीषण आग लागली होती. ही आग दहा दिवस चालू होती आणि त्यात खूप नुकसान झालं. त्या वेळी कंपनी प्रशासनाला मुंबईतील मोकळ्या जागेची गरज लक्षात आली. भविष्यात अशी मोठी आग लागली, तर बेघर झालेल्यांना तात्पुरता आसरा मिळावा, आग पसरू नये अशा दुहेरी उद्देशाने कंपनी सरकारने एस्प्लनेड ग्राऊंड आणि ओव्हल मदान ही दोन भली मोठी मदानं मोकळी सोडली. त्यातील एस्प्लनेड मदान म्हणजेच आजचं आझाद मदान!

जिमखाना ग्राऊंड

क्रिकेट तर इथे बाराही महिने खेळलं जातं. इकडच्या २० पेक्षा जास्त खेळपट्टय़ांवर मुंबईतील स्थानिक क्रिकेट पोसलं आहे. बॉम्बे जिमखाना ग्राऊंड अशीही या मदानाची ओळख! ती ओळख प्रस्थापित झाली ते १८७५ मध्ये या मदानात सुरू झालेल्या बॉम्बे जिमखान्यामुळे! या जिमखान्याची इमारत आणि अंतर्गत सजावट मुंबईच्या गतवैभवाची साक्ष देतात.

हवा खाण्याचं ठिकाण

त्या वेळच्या एस्प्लनेड ग्राऊंडचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे मुंबईतील घाम फोडणाऱ्या कडक उन्हाळ्यात माथेरान किंवा महाबळेश्वर इथे न जाऊ शकणारे साहेब लोक आणि एत्तदेशीय लोक याच मदानातील झाडांखाली तंबू ठोकून हवा खायला बसत.

विसाव्या शतकाच्या पहिल्याच दशकापासून देशात स्वातंत्र्याचे वारे वाहायला लागले आणि एस्प्लनेड ग्राऊंडवरची धूळही त्या वाऱ्यांमुळे उडू लागली. १९३१ मध्ये याच मदानात महात्मा गांधी यांनी ‘नमक का कायदा तोड दो’ ही घोषणा दिली होती. पुढे गांधी, नेहरू अशा राष्ट्रीय नेत्यांच्या विराट सभा या मदानाने बघितल्या.

मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून..

स्वातंत्र्योत्तर काळातही हे मदान असंतुष्ट असलेल्या आणि व्यवस्थेबद्दल पोटात संताप असलेल्या आंदोलकांचं हक्काचं स्थान राहिलं आहे. १९६९ मध्ये काँग्रेस फुटली आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा काँग्रेसची स्थापना झाली. त्या वेळी इंदिरा काँग्रेसचं पहिलं अधिवेशन याच आझाद मदानात झालं होतं. त्या वेळी ‘मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून..’ हे यशवंतराव चव्हाण यांचं ऐतिहासिक भाषणही याच मदानावरील सभेतलं!

स्वातंत्र्यानंतर आणखी एक अनोखं आंदोलन या आझाद मदानाने बघितलं. आंदोलन करणारे दुसरेतिसरे कोणी नसून लोकनियुक्त नगरसेवक होते. १९८४ मध्ये काँग्रेस सरकारने मुंबई महापालिका बरखास्त केली होती. वास्तविक महापालिका कायद्यानुसार मुंबई महापालिका बरखास्त करता येत नाही; पण काँग्रेसने वटहुकूम काढून हा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात तत्कालीन नगरसेवकांनी आझाद मदानातील झाडाखालीच प्रतिमहापालिका सुरू केली. त्या वेळी हे आंदोलन चांगलंच गाजलं होतं.

आंदोलकांचं आश्रयस्थान

स्वातंत्र्यानंतर विविध मागण्यांसाठी कामगार संघटनांकडून काढल्या जाणाऱ्या जाणाऱ्या मोर्चामुळे मुंबईचे रस्ते ‘लाल बावटा’मय होऊ लागले. त्या वेळी इथले रस्ते अडून वाहतुकीचा बोजवारा उडतो म्हणून उच्च न्यायालयाने आदेशाच्या एका फटकाऱ्याने मुंबईच्या रस्त्यांवर मोर्चे काढण्यावर बंदी आणली. तेव्हापासून थेट मंत्रालयावर धडकणारे आंदोलकांचे मोच्रे आझाद मदानात अडवले जाऊ लागले आणि मग तेव्हापासून हे मदान आंदोलकांचं आश्रयस्थान बनलं.

आझाद मदानाचा महापालिकेसमोरचा कोपरा मुकाटपणे या आंदोलनांचे वारे अंगावर झेलत असतो. दिवसभर या आंदोलकांच्या घोषणा मदानावरील मातीवर विसावतात. संध्याकाळी एखादी वाऱ्याची झुळूक येते आणि ही माती अलगद उडवून लावते. आझाद मदान पुन्हा ताजंतवानं होतं.. दुसऱ्या दिवशीची आंदोलनं, नव्या घोषणा झेलण्यासाठी!

रोहन टिल्लू @rohantillu

tohan.tillu@expressindia.com