मुंबई : वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्व बांधकामांच्या ठिकाणी धूळ व प्रदूषण नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी केलीच पाहिजे, तसे न केल्यास खासगी असो किंवा शासकीय बांधकामांचे काम थांबवण्यात येईल, असा सक्त इशारा मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी दिला आहे.

धूळ व प्रदूषण नियंत्रणाची नवीन मार्गदर्शक तत्त्वे सोमवार, २३ ऑक्टोबरपर्यंत प्रसारित करण्यात येतील, त्यांचे पालन सर्व घटकांनी व यंत्रणांनी करणे आवश्यक आहे, अन्यथा कोणताही मुलाहिजा न बाळगता त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी ताकीदही चहल यांनी दिली आहे.

nagpur, polling station,
मतदान केंद्रावरील कर्मचारीच म्हणतो, बोटाला शाई कशाला हवी?
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना

हेही वाचा – मुंबई : एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याची सायबर फसवणूक, बीकेसी पोलिसांकडून तपास सुरू

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेचा स्तर वाईट झाला आहे. वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून हवेतील प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सर्व संबंधित खात्यांसह एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, एमएमआरसीएल, एमआयडीसी आदी यंत्रणा तसेच क्रेडाई, एमसीएचआय, नारेडको, पीइएटीए या विकासकांच्या विविध संघटनांची संयुक्त बैठक चहल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. त्यावेळी मार्गदर्शन करताना चहल बोलत होते. या बैठकीत चहल यांनी धूळ व प्रदूषण नियंत्रासाठीचे विविध निर्देश देतानाच सक्त सूचनादेखील केल्या.

मुंबईतील हवेचा स्तर खालावण्यामागे धुळीचे प्रमाण जास्त असणे हे मूळ कारण आहे. ही धूळ बांधकामामुळे निर्माण होते. मुंबईत सध्या सहा हजार ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे बांधकामाशी संबंधित सर्व शासकीय आणि खासगी यंत्रणांना या बैठकीला बोलावण्यात आले होते. या बैठकीला प्रधान सचिव (मुख्यमंत्री कार्यालय) विकास खारगे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे, म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, बांधकामे व विकास क्षेत्रातील क्रेडाई, एमसीएचआय, नारेडको, पीइएटीए या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल म्हणाले की, पावसाळा संपून जेमतेम १० – १५ दिवस उलटत नाही तोच मुंबई प्रदेशात व मुंबई महानगरात हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याची दखल केंद्र व राज्य शासनाने घेतली असून तत्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हवेतील प्रदूषण वाढण्यामागे धूळ हा एक मोठा घटक आहे. बांधकाम व्यवसाय अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक असला तरी त्यामध्ये धूळ प्रतिबंधक उपाययोजना करणे, प्रदूषणास कारणीभूत इतरही घटकांना नियमांनुसार कार्यवाही करायला लावणे, यासाठी मुंबईतील सर्व शासकीय यंत्रणांनी आपापसात समन्वय राखून तातडीने व सक्तीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई प्रदेशातील इतरही महानगरपालिका व संबंधित संस्थांची तातडीने बैठक घेवून उपाययोजनांना गती द्यावी, असे आवाहनही चहल यांनी केले.

बांधकामांबाबत सूचना

  • एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान ३५ फूट उंचीचे लोखंडी / पत्र्यांचे आच्छादन असावे. त्याशिवाय, संपूर्ण बांधकाम क्षेत्र ज्यूट किंवा हिरव्या कपड्याने झाकलेले असावे.
  • एक एकरपेक्षा कमी भूखंडावर किमान २५ फूट उंचीचे लोखंडी / पत्रे/ कापडांचे आच्छादन असावे.
  • प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी पाण्याची फवारणी (स्प्रिंकलर) यंत्रणा असावी आणि धूळ उडू नये यासाठी दिवसातून किमान ४-५ वेळा पाण्याची फवारणी करावी.
  • प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी पुढील १५ दिवसांत धूळ प्रतिबंधक यंत्र (ऍण्टी स्मॉग मशीन) बसवावे.
  • मुंबईतील रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने धूळ प्रतिबंधक यंत्र (ऍण्टी स्मॉग मशीन) वाहने कार्यान्वित करण्यात येतील.
  • प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी स्वतंत्र वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी.
  • मेट्रो, रस्ते, उड्डाणपूल आदी शासकीय निर्माणाधीन कामाच्या ठिकाणीही ३५ फूट उंचीच्या आच्छादनांसह तुषार फवारणी व धूळ प्रतिबंधक संयंत्रांची व्यवस्था असावी.
  • मेट्रो रेल्वेची बांधकामे सुरू असणाऱ्या ठिकाणी संबंधित यंत्रणांनी परिसरातील हवेच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष देवून आपल्या अखत्यारित सर्व उपाययोजना कराव्यात.
  • इमारती अथवा कोणतेही बांधकाम पाडतानासुद्धा आजुबाजूने आच्छादन करून नंतरच बांधकाम पाडावे, जेणेकरून धूळ पसरणार नाही. तसेच सर्व नियमांचे पालन केले जावे.
  • धूळ निर्माण होईल असे कोणतेही बांधकाम पूर्णत: झाकलेलेच असावे.
  • बांधकामासाठी लागणारे मार्बल, दगड, लाकूड आदींची कटाई, ग्राइंडींग आदी कामे बंदिस्त भागात किंवा आच्छादन असलेल्या भागातच करावी.
  • बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मनुष्यबळाच्या संरक्षणासाठी मास्क, चष्मा आदी संरक्षण साहित्य दिले जावे.

बांधकामासाठी वापरली जाणारी वाहने –

  • बांधकाम साहित्य तसेच राडारोडा (डेब्रीज) ने-आण करणारे वाहन झाकलेले असावे. तसेच, वाहनांची वजन मर्यादा पाळावी, या वाहनांत मर्यादेपेक्षा अधिक वजन वाहून नेऊ नये.
  • बांधकाम राडारोडा (डेब्रीज) ने-आण करताना, प्रत्येक खेपेच्या वेळी तुषार फवारणी करावी. तसेच वाहनांची चाके प्रत्येक खेपेनंतर धुवून स्वच्छ केली जावी.
  • वाहने क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेत नाही, तसेच वाहनांच्या चाकांची प्रत्येक खेपेनंतर व्यवस्थित स्वच्छता केली जात आहे, याची खातरजमा व्हावी, यासाठी प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावे.
  • बांधकामांशी संबंधित प्रत्येक वाहनाची पीयूसी चाचणी वेळेवर झालेली आहे, हे निश्चित करावे. चाचणी झाली नसल्याचे आढळून आल्यास त्यावर परिवहन विभागाने तत्काळ कारवाई करावी.

उद्योग व व्यवसायांसाठी सूचना-

  • मुंबईतील वीज, ऊर्जा, गॅसविषयक मोठ्या प्रकल्पांतून होणाऱ्या वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्याकडून कसोशीने प्रयत्न व्हावेत. शासनाने ठरवून दिलेल्या सर्व उपाययोजना त्यांनी केल्या आहेत किंवा कसे, याची फेरतपासणी करावी.
  • या प्रकल्पांच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या यंत्रणांची भरारी पथकाच्या माध्यमातून तपासणी करण्यात करावी. महानगरपालिकेच्या यंत्रणेनेदेखील फेरतपासणी करून रिफायनरींच्या परिसरातील हवेच्या गुणवत्तेची खात्री करावी. माहूल सारख्या परिसरांमध्ये यापुढे नियमितपणे व सक्तीने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व संबंधित यंत्रणांची असेल. अन्यथा, त्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागेल.

हेही वाचा – मुंबई : नवरात्रोत्सवातील पुजेहून परतणाऱ्या महिलेचे दागिने पळवले, कस्तुरबा पोलिसात गुन्हा दाखल

विशेष पथकाकडून पाहणी –

  • महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागअंतर्गत (वॉर्ड) येणाऱ्या बांधकाम ठिकाणांची पाहणी करण्यासाठी विशेष पथकं गठीत करावीत.
  • प्रत्येक विभागात किमान ५० पथकांची नियुक्ती करता येईल. या पथकांनी बांधकामांच्या ठिकाणी अचानक भेटी देवून थेट व्हिडीओ चित्रिकरण करावे. तसेच उपाययोजनांमध्ये काहीही कमतरता आढळून आल्यास थेट जागेवरच नोटीस देवून अशी बांधकामे लगेच रोखावीत.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

सोमवार दिनांक २३ ऑक्टोबरपर्यंत धूळ व प्रदूषण नियंत्रणाची मार्गदर्शक तत्त्वे नव्याने जारी करणार

  • धूळ रोखण्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या इमारतींची ठिकाणे ३५ फूट उंच पत्र्यांनी बंदिस्त करणे बंधनकारक.
  • संपूर्ण इमारत कपड्याच्या आच्छादनाने बंदिस्त करणे बंधनकारक.
  • पंधरा दिवसांत सर्व बांधकामांच्या ठिकाणी स्प्रींकलर तर महिनाभरात स्मॉग गन यंत्रणा लावण्याचेही निर्देश.
  • प्रमुख ५० ते ६० रस्त्यांवर सकाळच्या सुमारास स्मॉग गनने सूक्ष्म फवारणी करणार.
  • रिफायनरींच्या परिसरातील हवेच्या गुणवत्तेची फेरपडताळणी करण्याच्या सूचना.